
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक बिपिनदादा कोल्हे देवासारखे धावून आले, म्हणूनच आपला जीव वाचला अन्यथा काही खरं नव्हतं. सामाजिक जाणिवेतून तयार झालेले कोल्हे कुटुंब हे आजच्या युगातील आधुनिक देवदूत आहेत अशी प्रतिक्रिया धामोरीचे माजी उपसरपंच बाळासाहेब अहिरे यांनी व्यक्त केली.
तालुक्यातील धामोरी येथील कोरोना योद्ध्यांचा गुरुवारी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते गुरुवारी सन्मान करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते.
एकीकडे आईला कोरोनाने ग्रासले तिला उपचारासाठी कुठे न्यायचे हा प्रश्न तर दुसरीकडे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. आम्ही दोघे भाऊ कोरोना बाधित झालो. संजिवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक बिपिनदादा कोल्हे यांनी स्वतः कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोवीड केअर सेंटर व डेडीकेटेड सेंटर उभारून रुग्णांवर मोफत उपचार सुरू केले. त्यांना प्राणवायू कोठून व कसा मिळेल यावरची कमांड आपल्या हातात घेऊन कार्यरत राहिले. हजारो रुग्ण बरे करून घरी पाठवले. भावाला उपचारासाठी नाशिकच्या स्व. डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केल. कठीण प्रसंगात संजिवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे आणि डॉ. मिलिंदराव कोल्हे, प्रणव पवार, डॉ. अमृता पवार हे आमच्या भावाच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. तासातासाला ते अपडेट घेत होते. भाऊ कोरोनातून पूर्णपणे बरा झाला असतानाच वडिलांचे घरी निधन झाले. भावाला घरी आणायचे तर त्यालाही दवाखान्यातच मृत्यूने गाठलेच माणसावर संकट तरी किती यावी आणि ती कशी हाताळावी ही परीक्षा परमेश्वर पहात होता, अशा परिस्थितीत मी स्वतः कोरोनाग्रस्त झालो आणि उपचार सुरू केले. एवढ्या सगळ्या दुःखद घटना घडल्यानंतर जगून तरी काय करायचे असा प्रश्न माझ्या मनात नेहमी येत होता, त्यात तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे मला मानसिक ताण तणावातून बाहेर काढण्यासाठी सतत दूरध्वनीद्वारे प्रयत्न करत होत्या. त्यामुळे अशा कठीण प्रसंगात घरचे सख्खे कुणीच कामाला आले नाही. कोल्हे कुटुंबाला त्यांचे घरचे, कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आणि त्यांच्या परिचित सगेसोयरे यांचे दुःख असतानाही ते न डगमगता आमच्या पाठीशी उभे राहिले व मोलाचा आधार दिला त्यामुळे त्यांना आधुनिक काळातील देवदूत म्हटले तर वावगे ठरणार नाही. आमचे आयुष्य या कुटुंबाला मिळावे आणि तेच संपूर्ण कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे पालन पोषणकर्ते व्हावे हीच आशा यानिमित्ताने करावीशी वाटते असे बाळासाहेब अहिरे अत्यंत गहिवरून बोलताना त्यांच्या डोळ्यातील आसवांच्या धारा थांबतच नव्हत्या.
