फळबाग उत्पादक सहकारी संस्थांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत समावेश करावा :- आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- आर्थिक अडचणीत असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महायुती शासनाने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करण्याचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मात्र या कर्जमाफीचा फायदा कोपरगाव मतदार संघातील काही फळबाग उत्पादक सहकारी संस्थांना होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत कोपरगाव मतदार संघातील राहिलेल्या सर्व फळबाग उत्पादक सहकारी संस्थांचा समावेश करावा अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे कृषी मंत्री ना.दत्तात्रयजी भरणे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात आमदार आशुतोष काळे यांनी असे म्हटले आहे की, कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील विविध फळबाग फलोद्यान व भाजीपाला उत्पादक सहकारी संस्था या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभासद संस्था असून त्या नियमितपणे पीक कर्ज व कृषी कर्जाचा लाभ घेत आहेत. सदर संस्था व त्यांचे सभासद शेती व्यवसायावर पूर्णता अवलंबून असून कृषी उत्पादन वाढीसाठी तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी या सर्व संस्था महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. यापूर्वी शासनाच्या कर्जमाफी योजनांमध्ये अशा स्वरूपाच्या संस्थांचा समावेश करण्यात आलेला होता.
मात्र पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजने अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीमध्ये कोपरगाव मतदार संघातील पात्र संस्थांचा समावेश झालेला नसल्यामुळे संबंधित सभासद, शेतकरी यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार नाही व त्यांच्या आर्थिक अडचणी वाढणार आहेत. या सर्व संस्था जिल्हा बँकेकडून कर्ज घेऊन त्यांची नियमित परतफेड करणाऱ्या संस्था असून शासनाने त्यांच्याकडे विशेष बाब म्हणून सकारात्मक दृष्टीने पाहण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी राहिलेल्या या सर्व संस्थांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत समावेश करावा अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी कृषिमंत्री नामदार दत्तात्रयजी भरणे यांना दिलेल्या निवेदनात केलेली आहे.
