कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव विधानसभा मतदार संघात चालू खरीप हंगामात जवळपास २१ हजार ५०० हेक्टर क्षेत्र सोयाबीनचे राहण्याचा अंदाज असून त्याप्रमाणात जास्तीत जास्त सोयाबीन बियाणांचा व खतांचा पुरवठा व्हावा तसेच मागील मागणीप्रमाणे स्वयंचलीत हवामान केंद्र वाढवावे अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्याकडे खरीप आढावा बैठकीत केली.
पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार (दि.१३) रोजी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्ह्याची खरीप आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सहभागी होत आमदार आशुतोष काळे यांनी खरीप हंगामात शेतकऱ्यांना येणाऱ्या संभाव्य बियाणे, खतांच्या टंचाईकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधत स्वयंचलीत हवामान केंद्राची संख्या वाढविण्याबाबत आग्रह धरला. ते म्हणाले की, सोयाबीनला मिळालेला उंचाकी दर यामुळे सोयाबीन क्षेत्र वाढणार शंका आहे. मात्र दुसरीकडे मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे झालेले नुकसान त्यामुळे सोयाबीन बियाण्याची साठेबाजी होवून कुत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे वाढीव दराने खरेदी करण्याची वेळ येवू नये यासाठी योग्य उपाययोजना करण्यात याव्या. त्याचप्रमाणे ऐन खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना रासायनिक खते वेळेवर मिळत नाही. त्यामुळे पेरणीचा हंगाम वाया जावून शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यासाठी बियाण्यांप्रमाणे खते देखील शेतकऱ्यांना वेळेत मिळावी. मागील वर्षी सोयाबीन बियाण्यात काही शेतकऱ्यांची फसवणूक झाली होती अशी परिस्थिती यावर्षीच्या खरीप हंगामात पुन्हा उदभवणार नाही त्यासाठी बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांना काळजी घेण्याच्या सूचना द्याव्या. मागील दोन वर्षापासून कोपरगाव विधानसभा मतदार संघात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. कोपरगाव तालुक्यात असलेल्या महसूल मंडलातील स्वयंचलीत हवामान केंद्रावर होणाऱ्या पावसाच्या नोंदीवरून नुकसानभरपाईचे निकष ठरले जातात. तालुक्यात प्रत्येक महसूल मंडलात प्रत्येकी एकच स्वयंचलीत हवामान केंद्र आहे. एका मंडलात अनेक गावे असल्यामुळे मंडलातील एका गावात पाऊस पडला तरी तो संपूर्ण मंडलात पडतोच असे नाही. एकच स्वयंचलीत हवामान केंद्र असल्यामुळे झालेल्या पर्जन्यमानाची अचूक आकडेवारी त्या स्वयंचलीत हवामान केंद्रात नोंदविली जात नाही.त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रत्यक्षात नुकसान होऊन देखील नुकसानीची मदत मिळण्यासाठी पात्र असतांना देखील शासनाकडून मिळणाऱ्या नुकसानभरपाई पासून तसेच हवामान आधारित पीकविमा व दुष्काळाच्या अनुदानापासून वंचित राहत आहे. त्यासाठी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील प्रत्येक मंडलात स्वयंचलीत हवामान केंद्राची संख्या वाढविण्याची मागणी केली. त्याबाबत पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी आमदार आशुतोष काळेंच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

फोटो ओळ:-
पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्याशी ऑनलाईन खरीप आढावा बैठकीत चर्चा करतांना आ. आशुतोष काळे.
