
कोपरगांव प्रतिनिधी:-
माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांचा सामाजिक कार्याचा संघर्ष आणि विकासाचा प्रवास थक्क करणारा असून आम्हा सिने अभिनेत्यांना त्यांची प्रत्येक कृती शिकवण देणारी आहे, त्यांच्या निधनाने विकासाच्या रंगमंचावरील महामेरु हरपला अशा शब्दांत मराठी सिनेअभिनेते चिन्मय उदगीरकर यांनी श्रद्धांजली वाहिली.
मंगळवारी मराठी सिने अभिनेते श्री चिन्मय उदगीरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोल्हे कुटूंबियांची भेट घेऊन सांत्वन केले त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी सिंधुताई कोल्हे, नाशिक मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या सरचिटणीस निलीमा वसंतराव पवार, बंधू दत्तात्रय कोल्हे, संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे, डॉ. मिलींदराव कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टीटयूटचे कार्यकारी विश्वस्थ अमितदादा कोल्हे, सुमितदादा कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेकदादा कोल्हे, प्रणव वसंतराव पवार, वेदांग मिलींद कोल्हे, ईशान बिपिनदादा कोल्हे, डॉ. प्राची वसंतराव पवार, अमृता वसंतराव पवार, गोदावरी नदी स्वच्छता अभियानाचे आदिनाथ ढाकणे आदी उपस्थित होते.
श्री. चिन्मय उदगीरकर पुढे म्हणाले की, कलावंत अभिनयाने समृद्ध होतो, पण समाजकारणातून राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या शंकरराव कोल्हे कोल्हे यांनी वयाच्या २१ व्यां वर्षापासून हाती घेतलेले विकासाचे व्रत ९३ वर्षापर्यंत अविरतपणे सुरू ठेवले त्यातून त्यांची प्रत्येक कृती आम्हा सर्वांसाठी एक प्रेरणा देणारी आहे. माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरच्या काळात काम करून स्वतःला घडविले. शिक्षणांतून त्यांनी सहजानंदनगर परिसरात विकासाची संजीवनी उभी करत त्यातून अनेकांना घडविले. आज जग माहिती तंत्रज्ञानाने समृद्ध आहे. त्यामुळे प्रत्येक संदर्भ तात्काळ उपलब्ध होतात पण शंकरराव कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या देहबोलीला एका विशिष्ट उंचीवर नेण्यासाठी आणि पाटपाण्याच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी केलेले काम राज्याला आदर्शवत आहे. कोपरगावसह राज्याच्या अनेक तरुणiसमोर विकास कामांचा इतिहास रचून आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे. त्यांचा आदर्श सर्वांनी आत्मसात करावा हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल.
