कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव–सावळीविहीर रस्त्यासाठी निधी मिळावा यासाठी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे केंद्रीय रस्ते, वाहतूक, दळणवळण मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करीत होते. त्या पाठपुराव्याची दखल घेवून ना. नितीन गडकरी यांनी अहमदनगर येथे एका कार्यक्रम प्रसंगी एन. एच. ७५२ जी राष्ट्रीय महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण करण्याचे जाहीर करून निधी देणार असल्याचा दिलेला शब्द पूर्ण करून कोपरगाव-सावळीविहीर रस्त्यासाठी १७८ कोटी रुपये निधी दिला आहे. त्याबाबत निविदा देखील प्रसिद्ध झाल्या आहेत. कोपरगाव सावळीविहीर रस्त्यासाठी मिळालेला निधी ना. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नांचे फलित आहे. मात्र ज्यांचा याच्याशी काडीचाही संबंध नाही ते श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याची टीका कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम यांनी विवेक कोल्हे यांचेवर केली आहे.
एन. एच. ७५२ जी या राष्ट्रीय महामार्गाच्या कोपरगाव ते सावळीविहीर या रस्त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभाग नासिक यांचेकडून १७८ कोटीच्या खर्चाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याबद्दल ना. आशुतोष काळे यांनी दिल्ली येथे जावून केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांचे कोपरगाव विधानसभा मतदार संघातील नागरिकांच्या वतीने आभार मानले आहे. त्यावेळी मतदार संघातील रस्ते विकासाबाबत झालेल्या सविस्तर चर्चेदरम्यान ना. आशुतोष काळे यांनी त्यांना निवेदन देवून गोदावरी नदीवर सुरेगाव-सांगवी, मायगाव देवी-वेळापूर पुलासाठी तसेच एस. के. एफ. च्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांसाठी निधी मिळावा अशी मागणी केली आहे. त्याबाबत मतदार संघातील नागरिकांना ना. आशुतोष काळे हे स्वत: माहिती देणार होते. मात्र त्यांच्या आजीचे निधन झाल्यामुळे ते माहिती देवू शकले नाही. मात्र नेहमीच न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यात तरबेज असणाऱ्या विरोधकांनी या संधीचा फायदा घेत प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.
सिन्नर, शिर्डी, अहमदनगर, दौंड, बारामती, पैठण ते कर्नाटक राज्यातील शिकोडी पर्यंत (राष्ट्रीय महामार्ग) एन.एच.१६० मंजूर करण्यात आला व राहाता तालुक्यातील सावळीविहीर फाटा ते सेंधवा (म.प्र.) पर्यंत या रस्त्यासाठी (राष्ट्रीय महामार्ग) एन.एच.७५२ जी असा क्रमांक देण्यात आलेला होता. मात्र हा राष्ट्रीय महामार्ग एन.एच.ए.आय.कडे हस्तांतरीत करण्यात आलेला नव्हता. हा राष्ट्रीय महामार्ग एन.एच.ए.आय.कडे हस्तांतरीत करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे ना. आशुतोष काळे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. तसेच हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्यासाठी राज्यशासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र देखील ना. आशुतोष काळे यांनी मिळवून दिल्यामुळे या रस्त्यासाठी निधी मिळण्याच्या अडचणी दूर झाल्या होत्या. ना. नितीन गडकरी अहमदनगर येथे एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी एन. एच. ७५२ जी राष्ट्रीय महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण करण्याचे जाहीर करून निधी देणार असल्याचा शब्द दिला होता. दिलेला शब्द पूर्ण करणारा नेता अशी खासियत असलेल्या ना. गडकरी यांनी आपला शब्द पूर्ण करून कोपरगाव-सावळीविहीर रस्त्यासाठी १७८ कोटी रुपयांचा निधी दिला आहे.या कामाची निविदा देखील प्रसिद्ध झाली असून या रस्त्याचा प्रश्न ना. आशुतोष काळे यांच्या अथक प्रयत्नांमुळेच सुटला आहे. ज्यावेळी ना. गडकरी अहमदनगर येथे आले व त्यांनी निधी देणार असल्याचे जाहीरपणे सांगितले होते त्यावेळी ना. आशुतोष काळे कोरोना बाधित असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. त्यावेळी देखील विरोधकांनी नागरिकांमध्ये संभ्रम पसरवून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला होता. आता देखील दुसऱ्यांदा श्रेय घेण्याचा त्यांचा प्रयत्न केविलवाणा असल्याचे रोहोम यांनी म्हटले आहे.
चौकट :- मागील पाच वर्षात आपल्या पक्षाचे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार होते. त्यावेळी निवडून आल्यावर विरोधकांनी पहिल्याच वर्षी या कोपरगाव-सावळीविहीर रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणे अपेक्षित होते. मात्र सत्ता असतांना त्यांना पाच वर्षात जे जमले नाही ते ना. आशुतोष काळे यांनी दोन वर्षात करून दाखविले. त्यासाठी त्यांनी रस्त्याच्या कामात येत असलेल्या अडचणी सोडवून केलेला पाठपुरावा मतदार संघातील जनतेला माहित आहे. मात्र कोणत्याही प्रकारचे योगदान नाही, पाठपुरावा नाही, अडचणींची माहिती नाही ते श्रेय घेण्याचा करीत असलेला प्रयत्न अज्ञानी माणसाचे लक्षण आहे- सुधाकर रोहोम

फोटो ओळ:-
कोपरगाव ते सावळीविहीर रस्त्यासाठी १७८ कोटी निधी दिल्याबद्दल ना. आशुतोष काळे यांनी केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांचे आभार मानले.
