सद्यस्थितीत घरपट्टी वाढवणे उचित नाही, जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे :- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर- कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना वाढीव दराने घरपट्टी दिल्या आहेत. परंतु सद्याची परिस्थिती पाहता घरपट्टी वाढवणे उचित नाही. त्याबाबत आपण व्यक्तिश: लक्ष घालावे अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्याकडे केली.
जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी शुक्रवार (दि.१२) रोजी कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर गावात भेट दिली यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी मतदार संघातील विकासाच्या विविध प्रलंबित प्रश्नाबरोबरच कोपरगावकरांच्या वाढीव घरपट्टीकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाकडून कोपरगाव शहरातील नागरीकांची घरपट्टी वाढविणे प्रस्तावित होते. त्याबाबत असंख्य नागरीकांनी हरकती नोंदविल्या असून त्या हरकतींची अद्याप सुनावणी झालेली नसतांना अचानकपणे कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाकडून वाढीव दराने घरपट्ट्या देवून कर वसुली सुरु करण्यात आली आहे. सध्याची परिस्थिती पाहता महागाईचे प्रमाण मोठ्या प्रमणात वाढले असून नागरीकांना संसार प्रपंच करतांना प्रचंड ओढाताण करावी लागत आहे. अशा परिस्थितीत कोपरगाव नगरपरिषदेने वाढव दराने घरपट्टी वसुली सुरु केल्यामुळे नागरीकांच्या अडचणी वाढणार आहेत. त्यामुळे एकूण परिस्थितीचा विचार करून वाढविण्यात आलेली घरपट्टी वाढ तूर्तास थांबवावी व त्याबाबत कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास जगताप यांना सूचना द्याव्यात अशी मागणी केली. या मागणीला जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
वाढीव घरपट्टी बाबत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे निवेदन
चौकट:- वाढीव घरपट्टीच्या निर्णयासंदर्भात नगरपालिकेने विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्याची मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी नगरपालिका उपमुख्याधिकारी मनोजकुमार पापडीवाल यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. कोपरगाव नगरपरिषदेकडून अत्यंत चुकीच्या पद्धतीने घरपट्टी वाढ करण्यात आली असून याचा ज्येष्ठ नागरिक, मध्यमवर्गीय कुटुंब, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांवर वाढीव कराचा आर्थिक भार पडणार आहे. वाढीव घरपट्टी आणि मालमत्ता करासंदर्भात तातडीची विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात यावी. तसेच वाढीव घरपट्टीच्या निर्णयाचा पुनर्विचार करून कर आकारणीतील विसंगती व त्रुटींची सखोल निराकरण करावे. नागरिकांच्या हरकती व सूचनांचा विचार करावा आणि जुन्या कर आकारणी पद्धतीने घरपट्टी आकारणी करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा असे निवेदनात म्हटले आहे.
