
महाराष्ट्र सीमालढ्यातील आधारस्तंभ हरपला..!!
जेष्ठ नेते एन. डी. पाटील यांच निधनाने अतीव दुःख, मंत्री छगन भुजबळ यांची त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!!
कोपरगाव प्रतिनिधी:-
शेकापचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्राच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेते प्राध्यापक एन.डी.पाटील यांच्या निधनाच्या वृत्तामुळे अतीव दुःख झाले असून महाराष्ट्राचा संघर्ष यात्री हरपल्याची भावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.
आपल्या शोकसंदेशात मंत्री छगन भुजबळ म्हणाले की आपल्या संपूर्ण आयुष्यात सर्वसामान्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून त्यांनी संघर्ष केला. त्यामुळे शेतकरी,कष्टकरी आणि कामगारांच्या लढ्याचा आवाज आज शांत झाला आहे. शेतकरी, कामगारंसह एन. डी पाटील यांचे शिक्षणक्षेत्रातले अमूल्य योगदान देखील मोठे आहे.
यावेळी बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की माझा आणि त्यांचा परिचय हा महाराष्ट्र- बेळगाव सिमवासीयांच्या लढाईत झाला होता. या लढ्यातील जी सुरवातीची नेत्यांची फळी होती त्यातले एन. डी पाटील हे एक महत्वाचे नाव होते. त्यांच्या बद्दल सर्वांच्याच मनात आदराची भावना होती आणि ती कायम राहील.
पाटील यांच्या निधनाने राज्याच्या सामाजिक, राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्व हरपलं असून मी व माझे कुटुंबीय पाटील कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो ही प्रार्थना करतो अश्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
