
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- मागील काही दिवसांपासून कोपरगाव विधानसभा मतदार संघात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचे महसूल विभागाकडून बहुतांश पंचनामे करण्यात आले असून पंचनामा करण्याच्या प्रक्रिया अजूनही मतदार संघात सुरु आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीचे जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले असून त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे ज्या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे तसेच जिल्हा परिषदेमार्फत बांधण्यात आलेल्या अनेक पूल व छोट्या-मोठ्या बंधाऱ्यांचे देखील या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. त्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव तातडीने तयार करण्याच्या सूचना आ.आशुतोष काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व पंचायत समिती प्रशासनाला दिल्या आहेत.
मागील दोन वर्षापासून मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत आहे हि समाधानाची बाब असली तरी मतदार संघातील अनेक गावात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून रवंदा मंडलात मंगळवार (दि.२८ सप्टेंबर) रोजी ६९.५ मिमी पावसाची नोंद झाली असून त्याप्रमाणे मतदार संघातील इतर गावात देखील अतिवृष्टी झाली आहे. दोन वर्षापूर्वी कोपरगाव विधानसभा मतदार संघात झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना २७.९५ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळवून दिलेली असून कोपरगाव शहरातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना व नागरिकांना देखील ९५ लाखाची नुकसान भरपाई मिळवून दिली आहे. चालू वर्षी देखील परतीचा पाऊस मतदार संघात अपेक्षेपेक्षा जास्त पडल्यामुळे खरीपाचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर या अतिवृष्टीचा मतदार संघातील रस्त्यांना देखील मोठा फटका बसला असून जिल्हा परिषदेच्या मार्फत बांधण्यात आलेले छोटे पूल व छोटेमोठे बंधारे बांधण्यात आले आहे त्या बंधाऱ्यांचे देखील नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे प्रस्ताव तयार करून शासनाकडे त्वरित सादर करण्याचे निर्देश तहसीलदारांना दिले आहेत. जेणेकरून या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळवून देता येणार आहे. तसेच अतिवृष्टीमुळे ज्या रस्ते, पूल व छोट्या-मोठ्या पुलांना हानी पोहोचली आहे त्यांचे देखील झालेल्या नुकसानीचे प्रस्ताव तयार करावे. या रस्त्यांच्या व पुलांच्या दुरुस्तीसाठी देखील शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करून जास्तीत जास्त निधी मिळवणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.
