
कोपरगाव प्रतिनिधी:-
“के. जे. सोमैया महाविद्यालयातील प्राध्यापक प्रबोधिनी व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या अंतर्गत अफगाणिस्तानमधील सद्य शिक्षण परिस्थितीवर प्रकाश टाकण्यासाठी आंतरराष्ट्रीय आमंत्रित चर्चासत्र आयोजित केले होते व यामध्ये अफगाणिस्तान मधील प्रा. सेबगतुल्लाह शिरझाई व कु. फातिमा तोखी यांनी आपले विचार मांडले. हि चर्चा अफगाणिस्तान मध्ये तालिबान सरकारच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या दूरगामी घटनांना जगाच्या पातळीवर आणण्यात यशस्वी होईल व शिक्षण क्षेत्रात सुधारणा व्हावी यासाठी जागतिक आवाज तयार करेल यात शंका नाही.” अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .बी. एस. यादव यांनी सांगितले.
कार्यक्रम आयोजनाचा हेतू स्पष्ट करताना या कार्यक्रमाचे संयोजक व प्राध्यापक प्रोबोधिनीचे सदस्य प्रा रविंद्र जाधव म्हणाले कि, “अलीकडेच तालिबानींनी अफगाणिस्तानात आपले सरकार स्थापन केले आहे आणि जागतिक पातळीवर हि मोठी चिंतेची बाब आहे. कारण तालिबानी सरकारने नागरीक, अर्थव्यवस्था, शिक्षण इत्यादींसाठी मानवतेच्या विरोधात नियम तयार केले आहेत. यामुळे अफगाणिस्तान एका मोठ्या धोक्याचा उंबरठ्यावर उभा आहे. एकीकडे कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर शिक्षण व्यवस्था जागतिक पातळीवर कोलमडली आहे. यामुळे अफगाणिस्तानसह संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर वाईट परिणाम झाला आहे. परंतु त्याही परिस्थितीत त्या विरुद्ध जागतिक लढा चालू आहे. परंतु त्याच वेळी अफगाणिस्तानमधील शिक्षण प्रणाली तालिबानी सरकारचे शिक्षणविरोधी धोरण वाईट या आणखी एका कारणामुळे वाईट पद्धतीने प्रभावित झाली आहे. अलीकडे जगभरातील शाळा, महाविद्यालये व विद्यापीठे कोविड 19 मुले बंद आहेत तर अफगाणिस्तानमध्ये तालिबानी सरकारच्या शिक्षण विरोधी धोरणामुळे बंद आहे. विशेषतः तालिबानी सरकारने मुलींच्या शिक्षणावर बंदी घातली हे अत्यंत घातक आहे. पाकिस्तान मध्ये मलालाने २० वर्षांपूर्वी तालिबानी शिक्षण विरोधातील प्रवृत्ती बरोबर युद्ध जिकून मुलींना शिक्षण उपलब्ध करून दिले होते. भारतात सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये मुलींना शिक्षण देण्यासाठी यशस्वीरित्या लढा दिला होता आणि जगभरात असे अनेक लढे लढले गेलेत. जर आपण मुलींना शिक्षण देण्यात अपयशी ठरलो तर एक शिक्षण क्षेत्रातील सदस्य म्हणून हे आपले मोठे अपयश आहे व हि चिंतेची बाब आहे. परंतु आजची हि चर्चा अफगाणिस्तानमधील शिक्षण धोरणात चांगले बदल घडवून आणण्यात योगदान देऊ शकते. कारण शब्द आणि विचार शस्त्रांपेक्षा अधिक शक्तिशाली असतात. आपले शब्द आणि विचार तालिबानी सरकारच्या निर्णयाला पराभूत करू शकतात. आणि चर्चा आयोजित करण्यामागची हीच मध्यवर्ती कल्पना आहे. आणि सुदैवाने एक मलाला कु. फातिमा तोखी हि या कार्यक्रमात सहभागी झाली आहे. फातिमा हि मलालापेक्षा कमी नाही कारण या चर्चेचा भाग बनून तिने सिद्ध केले आहे कि, शिक्षणविरोधी व्यवस्थेविरोधात लढण्याची इच्छा तिने यातून दाखवून दिलेली आहे. आणि या कारणास्तव आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.”
प्रा. सेबगतुल्लाह शिरझाई आपल्या व्याख्यानात म्हणाले कि, भारतातील शिक्षण संस्थेने आमच्या वेदनेची दखल घेतली हि बाब अफगाणिस्तान मधील शिक्षण व्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी अतिशय महत्वाची भूमिका पार पाडेल. आज जगाच्या पाठीवर अफगाणिस्थान सगळ्या बाबतीत खूप मागे आहे आणि तो आणखी मागे ढकलला गेला आहे. अफगानिस्तान मध्ये शैक्षणिक बरोबर धार्मिक शिक्षणाला महत्व दिले जाते. तालिबान सरकार येण्यापूर्वी शिक्षणावर खर्च कमी प्रमाणात का होईना पण सरकारद्वारे तो केला जात होता परंतु तालिबानने हा खर्च बंद करून शिक्षण व्यवस्था थांबविली आहे. आजमितीला अफगानिस्तान मध्ये 8.4 दशलक्ष विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि जवळपास ५ दशलक्ष विदयार्थी कधीही शाळेत गेलेले नाहीत. परंतु तालिबान सरकारने शाळा, महाविद्यालये व विद्यापीठे बंद केल्यामुळे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी सुद्धा शिक्षणापासून वंचित होत आहेत. अफगाण मध्ये पायाभूत शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत. काही ठिकाणी तर ब्लॅकबोर्ड देखील नाहीत. शिक्षक कागदावर लिहून शिकविण्याचा प्रयत्न करतात. परंतु प्राप्त परिस्थितीत विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी धडपड करत आहेत हि जमेची बाब आहे . येणाऱ्या पिढीला शिक्षणासाठी उत्सुकता आहे परंतु अंतर्गत कलहामुळे शिक्षणाचा दर्जा ढासळला आहे, अभ्यासक्रमामध्ये एकसमानता नाही,ग्रामीण आणि दुर्गम भागात शाळांची व वाहतुकीची कमतरता, व्यावसायिक शिक्षकांची कमतरता, तालिबानी लोकांनीं शिक्षण संस्था आणि विद्यापिठाच्या इमारती पाडल्या आहेत, सहशिक्षण बंद केलेले आहेत त्यामुळे मुले व मुली एकत्र शिक्षण घेऊ शकणार नाहीत. पुरुष शिक्षकांनी मुलींना शिकवायचं नाही. इतकेच नाही तर मुलींना शिक्षण बंद करणे हा तालिबानी सरकारचा विचार आहे आणि तो त्यांनी अंमलात आणायला सुरुवात केली आहे. मुलींना शिक्षण देऊ नये अशी बहुसंख्य मागासलेल्या मासिकतेच्या अफगानी लोकांची आहे. शिक्षण घेण्यासाठी महिलांसह पुरुषांना पुरेशी सुरक्षितता नाहीत. मुलींमध्ये भीतीचे वातावरण आहे. शिक्षण संस्था, विद्यापीठे आणि विद्यार्थी आणि शिक्षक यांना स्थानिक लोकांकडून धोका पोहचविला जातो आहे. मुलींचे लग्न खूप लवकर केले जाते. संशोधन असे सांगते कि, जवळपास १७% मुलींचे लग्न वयाच्या पंधरा वर्षपूर्वीच केले जाते. मुलीच्या संमतीशिवाय विवाह केला जाऊ नये असा कायदा आहे. पण तो अमलात आणला जात नाही तर उलट तिचा आवाज दाबला जातो. कायद्याची तालिबानी लोकांकडून हत्या केली जात आहे. मुलींचे शिक्षण होत नाहीत शिक्षित महिला नाहीत. त्याचा परिणाम महिला शिक्षकांची कमतरता हि मोठी समस्या अफगाणिस्तान समोर आहे. मुलींची होणारा छळ हि जागतिक समस्या आहे कारण अमेरिकेसारख्या पुढारलेल्या व भारतासारख्या सहिष्णू देशात देखील महिला अत्याचार आहेत. परंतु अफगाणिस्थान मध्ये त्याबाबतीत परिस्थिती अतिशय खालावलेली आहेत. तालिबानी लोक रस्त्यावर महिलांचा छळ करतात. त्या घराबाहेर पडू शकत नाहीत. यासाठी जागतिक पातळीवर मदत झाली नाही तर मात्र अफगाणी मुली शिक्षणप्रवाहातून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. इस्लामने महिलांना खूप सारे अधिकार दिलेले आहेत पण तालीबाणी मात्र त्यांना त्यांचा अधिकारापासून वंचित ठेवत आहेत. लोक त्यांचा इच्छेने राहणीमान ठेवू शकत नाहीत, ते केस कापू शकत नाहीत, आवडीचे कपडे घालू शकत नाहीत, संगीत ऐकू शकत नाहीत, फक्त पारंपरिक कपडे परिधान करू शकतात. तशी सक्ती करण्यात अली आहे. याची पायमल्ली करणार्यांनी आपले प्राण गमावले आहेत. अफगाणिस्तान मध्ये शिक्षक सुरक्षित नाहीत. आत्तापर्यंत मला वैयक्तिक तालिबानींचे २४ फोन कॉल आलेले आहेत व धमकाविले जात आहे कि,जर्मनी आणि अमेरिकेच्या मदतीनें देत असलेले इग्रंजीचे शिक्षण बंद करा आणि माझ्यासारख्या इतर शिक्षकांना देखील धमक्या दिल्या जात आहेत. परंतु मी माझ्या देशावर, लोकांवर प्रेम करतो त्यामुळे मी शिक्षणाचे कामही सोडणार नाही आणि देशही सोडणार नाही. पाकिस्तान चा पगडा असणाऱ्या तालिबानींनी हे लक्षात घ्यावे कि , पाकिस्तान मध्ये शिक्षण, विद्यापिठे, मुलींचे शिक्षण आणि शिक्षण व्यवस्था चालू आहे मात्र अफगाणिस्तान मध्ये बंद आहेत. असे का?. मी माझ्या स्वतःच्या आई, बहिणी आणि घरातील सर्व मुलींनी शिकले पाहिजे या मासिकतेतून काम करण्याचा प्रयत्न करतोय. प्रशिक्षित महिला शिक्षक नसल्यामुळे मुलींना शिकवायला महिला शिक्षक नाहीत तर पुरुष महिला व मुलींना शिकवू शकत नाही असा फतवा आहे. काही प्रमाणात पुरुष शिक्षकाकडून मुली शिकण्याचा प्रयत्न करताय पण ते अतिशय कठीण समस्येला तोंड देऊन करत आहे. याउलट महिला शिक्षक पुरुषांना शिकवू शकत नाहीत. शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठात मुलींचे आणि मुलांचे वर्ग तालिबानींनी वेगवेगळे केलेले आहेत. हि कुठली शिक्षण पद्धती? महिला पुरुष समानता नाही का? असा प्रश्न पडतो. ह्या सगळ्या समस्या अफगाणिस्तान सोसत आहेत. माझी स्वतःची एक बहीण शिक्षक आहे पण ती शाळेत शिकवू शकत नाहीत. दुसरी बहीण डॉक्टर आहे पण ती हॉस्पिटलला जाऊ शकत नाहीत, भाऊ मिलिटरी ऑफिसर आहेत पण तो देशाची सुरक्षा करू शकत नाहीत हि सत्य परिस्थिती आहे आणि हीच परिस्थिती संपूर्ण अफगाणिस्तान मधील जनतेसंदर्भात आहेत. जगभरातील शिक्षक तंज्ञानी जर याविरुद्ध आवाज उठविला आणि अफगाणिस्तानच्या शिक्षणव्यवस्थेसाठी, मुलींच्या शिक्षणासाठी, विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी जर उभे राहिले तरच अफगाणिस्तान मधील शिक्षण व्यवस्था टिकेल. मुली सुरक्षित व स्वातंत्र्यात शिक्षण घेऊ शकतील. त्यामुळे आपण सर्वजण आमच्या साठी, शिक्षणासाठी आमच्या लढ्याला पाठिंबा द्या” असा आशावाद व्यक्त केला.
कु. फातिमा तोखी हिने आपल्या शिक्षण मिळविण्यासाठीची वेदना मांडतांना संपूर्ण जगाला आवाहन केले कि,आम्ही तालिबानी सरकारला घाबरून आमचे शिक्षण बंद करणार नाही आहोत. अफगाणिस्तान मधील आम्हा मुलींना शिक्षण मिळविण्यासाठी प्रयत्न करा. नाहीतर आम्ही मुली शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडू. हे सांगतानाच भारत देश सदैव अफगाणिस्तान विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करत असतो व आजच्या या चचर्चेद्वारे आमचा प्रश्न जागतिक पातळीवर मांडला याचा आनंद होतो आहे.” असे मत स्पष्ट केले.
इंडोनेशिया येथील प्रा. स्लॅमेट सुवन्तो यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत असतांना “आम्ही सर्वजण अफगाणिस्तान मधील शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी आम्ही अफगाणिस्तान मधील शिक्षणप्रेमींच्या सोबत अहोत. आणि हा लढा अफगाणिस्तान चा नसून जागतिक शिक्षणसमुदायाचा आहे” असे स्पष्ट केले. तर फिलीपिन्स मधील पेरपेच्युअल हेल्प मॅलिनो कॅम्पस विद्यापीठाच्या संगणक विभागाचे डीन प्रा. पास्टर आर्गुएल्लेस ज्यू . यांनी अध्यक्षीय समारोपात ” शिक्षण क्षेत्रात अश्या चर्चासत्रांचे गरज आहे. सध्या अफगाणिस्थान मधील शिक्षण व्यवस्थेचे कंबरडे मोडले आहेत . यातून जगाने धडा घेऊन अफगाणिस्तान मधील मुलींच्या, महिलांच्या व शिक्षणाच्या समस्या सोडविण्यासाठी योगदान दिले पाहिजे. या चर्चा सत्राद्वारे जगासमोर अफगाणिस्तानच्या शिक्षण पद्धतीबाबत सत्य मांडण्याचा प्रयत्न झाला आणि तो प्रा. सेबगतुल्लाह शिरझाई व कु. फातिमा तोखी यांनी केला ही कौतुकास्पद बाब आहे” असे प्रतिपादन केले.
अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख प्रा. विजय ठाणगे या प्रसंगी मत व्यक्त करताना म्हणाले कि, ” शिक्षणाने मानवाच्या जडणघडणीमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. देशाच्या विकासामध्ये शिक्षण अंत्यंत महत्वाचे असते. परंतु दुर्दवाने अफगाणिस्तान मध्ये शिक्षणाची अवस्था अंत्यंत वाईट आहे. परंतु या परिस्थितीमध्ये सुद्धा प्रा. सेबगतुल्लाह शिरझाई सारखे लोक आपल्या परीने शिक्षणाचे महत्व आपल्या देशातील लोकांना पटवून देत आहेत हे निश्चितच कौतुकास्पद आहे” या चर्चासत्रासाठी इंडोनेशिया , फिलिपिन सह भारतातील विविध प्राध्यापकांनी भाग घेतला अशी माहिती प्राध्यापक प्रबोधिनीचे प्रमुख डॉ. आर. के. कोल्हे यांनी दिली.
मैसूर विद्यापीठाच्या डॉ . रेखा जाधव, आसाम विद्यापीठाच्या डॉ. अदिती नाथ, बहिणाबाई विद्यापीठाचे डॉ. श्याम साळुंके व यांच्या सह ४२ प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वर्षा आहेर व प्रा. विजय खंडीझोड यांनी केले तर आभार प्राध्यापक प्रबोधिनीचे डॉ. नामदेव ढोकळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. शैलेंद्र बनसोडे, डॉ. संजय अरगडे व सर्व सहकारी प्राध्यापक यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे,मा.संजीवदादा कुलकर्णी, सदस्य मा. संदीपदादा रोहमारे , मा. प्राचार्य .डॉ . बी. एस यादव, अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे प्रा.विजय ठाणगे व. कार्यलयीन अधीक्षक डॉ. अभिजीत नाईकवाडे यांनी अभिनंदन केले.
