
कोपरगांव प्रतिनिधी:-
तालुक्यातील वेळापुर हद्दीतील वेळापुर ते पगारे वस्ती (वेळापुर सुरेगांव शिव रस्ता) रस्त्याचे काम २०१८.१९ मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर आहे, मात्र निर्मीती कन्स्ट्रक्शन औरंगाबाद इंद्रजीत थोरात ठेकेदारांने अर्धवट सोडल्याने वाहनधारकांना त्याचा प्रचंड त्रास होत आहे, अशी तक्रार श्री. राजेंद्र उर्फ बालाजी चांगदेव वैराळ यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना नाशिक कार्यालयाचे अधिक्षक अभियंता यांच्याकडे केली आहे. हे अर्धवट काम तातडीने पूर्ण करावे असेही या निवेदनात म्हटले आहे.
श्री. राजेंद्र वैराळ यांनी आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी या रस्त्याचे काम प्राधानान्यांने मंजूर केले. पूर्व बाजुस सूरेगाव ग्रामपंचायतीने यापुर्वी स्ट्रीट लाईटचे काम केले होते, आता रस्ता रुंदीकरण कामात हे स्ट्रीटलाईटचे पोल काही ठिकाणी मध्यभागी तर काही ठिकाणी रस्त्याचे कडेला गेले आहे, परिणामी या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहनधारकांना तसेच शेतकऱ्यांना तसेच परिसरातील नागरिकांना याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे, स्ट्रीट लाईटची पूल मधोमध असल्याने अनेक वेळा अपघात घडून अनेक जण जखमी झालेले आहेत, शेतकऱ्यांना आपला शेतमाल या रस्त्याने तालुक्याच्या ठिकाणी नेण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे, निर्मिती कन्स्ट्रक्शन च्या ठेकेदारांना यापूर्वी अनेक वेळा वारंवार सांगूनही त्यांनी या रस्त्याचे कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे, तेव्हा रस्त्याचे साईड गटारला पूर्व बाजुस स्ट्रीट लाईटचे पोल शिफ्ट करून मिळावे व राहिलेले डांबरीकरणाचे काम तातडीने पूर्ण करावे अन्यथा याविरुद्ध तीव्र आंदोलन छेडू असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
