खर्च करायचा कुणाच्या भरवशावर व कशासाठी?:- विजय वहाडणे…

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनिधी:- कोपरगाव शहरातील युवक -युवती व नागरिकांच्या सोयीसाठी विविध ठिकाणी ओपन जीम उभारण्याचा मानस होता व अजूनही आहे. किमान 5 – 6 ठिकाणी जरी ओपन जीम उभारल्या असत्या तर अनेकांच्या व्यायामाची सोय झाली असती. कारण खर्च करून जिममध्ये जाणे सर्वांनाच परवडत नाही. पण काही अपप्रवृत्ती सार्वजनिक सोयीसाठी असलेल्या अनेक ठिकाणी मोडतोड करत असल्याने नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान होते. असे कटू अनुभव सततच येत आहेत. फक्त जिजामाता उद्यानात असलेली ओपन जीम सुरक्षित आहे, कारण तेथे फक्त महिलांनाच प्रवेश आहे.
गांधीनगर येथे लाखो रूपये खर्च करून बांधलेल्या शौचालयात मोठ्या प्रमाणांत तोडफोड करण्यात आली आहे, वीज जोडण्या तोडण्यात आल्या. शौचालये-स्वच्छता गृहात तर अनेक ठिकाणी नुकसान केले जाते. उद्यानातही खेळणी-बाके तोडण्यात आली. महिलांसाठी 2 ठिकाणी सुरू केलेली स्वच्छता गृहेही तक्रारी आल्याने बंद आहेत. शहरात अजूनही स्वच्छता गृहांची (मुतारी) गरज आहे. पण कुणीही स्वतःच्या आसपासही उभारू देत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. शौचालयांचे दरवाजे-भांडी तोडफोड तर नेहमीच होते. मध्यंतरी उर्दु शाळेतही मोठी चोरी झाली. आठवडे बाजार-ओटे, स्व.सूर्यभानजी वहाडणे घाट इ. ठिकाणीही काही मद्यपी बाटल्या फोडून अस्वच्छता करतात, परिसरात अशांतता पसरवितात.
सर्वांच्या सोयीसाठी ओपन जीम उभारण्याची अनेकांची मागणी आहे, मागणी योग्यच आहे, पण कुणाच्या भरवशावर खर्च करायचा?
कारण नागरिकांनी कर रूपाने दिलेला पैसा वाया जाऊ नये असे वाटते. म्हणूनच असा खर्च करण्याचे धाडस होत नाही. तोडफोड, चोऱ्या असे गैरप्रकार शहरातील काहीजण करतात कि बाहेरून आलेले कुणी करतात? हे समजणे गरजेचे आहे. जागरूक नागरिकांनी दक्षता घेतल्यास शहराच्या हिताचे होईल असे वाटते. कारण नगरपरिषद प्रत्येक ठिकाणी चोविस तास लक्ष ठेवू शकत नाही. वैजापूर सारख्या शेजारच्या शहरात अनेक ठिकाणी ओपन जिम उभारून नागरिकांनी त्या अतिशय सुस्थितीत ठेवलेल्या आहेत. पण आपल्या शहरात आपण तसे करू शकत नाही, हे आपले सर्वांचे दुर्दैवच आहे असेच म्हणावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *