
कोपरगाव प्रतिनीधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील रांजणगाव देशमुख, बहादरपूर, वेस, सोयगाव, अंजनापुर, मनेगाव, व धोंडेवाडी या सात गावांसाठी असलेली रांजणगाव देशमुख प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे महत्व माजी आमदार अशोकराव काळे यांना होते व आमदार आशुतोष काळे यांना देखील आहे. त्यामुळे हि योजना सुरु करण्यासाठी ते भक्कम असून ज्यांनी पाच वर्ष आमदारकी असतांना या योजनेकडे ढुंकूनही पहिले नाही त्यांनी खोटा कळवळा दाखवू नये अशी टीका पोहेगाव गटाच्या जी.प.सदस्या सौ.सोनाली रोहमारे यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे नाव न घेता केली आहे.
माजी आमदार अशोकराव काळे यांच्या भगीरथ प्रयत्नातून तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांना सिंचनाच्या दृष्टीने वरदान ठरलेली रांजणगाव देशमुख उजनी चारी उपसा जलसिंचन योजना सुरु झाली होती. मात्र ज्यांनी आपल्या कार्यकाळात न परवडणारी योजना म्हणून रांजणगाव देशमुख प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवर शिक्कामोर्तब केले. त्यांची परंपरा पुढे ठेऊन माजी आमदारांनी त्यांच्या कार्यकाळात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सत्ता असतांना पाच वर्ष या योजनेकडे पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे हि योजना बंद पडली होती. त्याची किंमत २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मोजावी लागली हे त्यांनी विसरू नये. त्या पाच वर्षाच्या काळात दुर्लक्ष झाल्यामुळे या योजनेचा दुरुस्तीचा खर्च वाढला असतांना देखील आमदार आशुतोष काळे यांनी मागील वर्षी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या मदतीने हि योजना पुन्हा सुरु केली. या वर्षी देखील हि योजना सुरू होणार आहे. त्यामुळे ज्यांनी उजनी चारीसाठी ओव्हरफ्लोचे पाणी आरक्षित असतांना देखील २०१९ च्या पावसाळ्यात जायकवाडी धरण दोनवेळेस ओव्हरफ्लो होऊनही उजनी चारी कोरडी ठेवून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. त्यांनी आता कळवळा दाखवून उपयोग नाही. आपण किती कार्यक्षम होता हे या भागातील नागरिकांनी अनुभवले असून त्यामुळे त्यांनी तुम्हाला घरचा रस्ता दाखविला आहे. त्यामुळे यापुढे असा खोटा कळवळा दाखवू नका हि योजना पूर्ण क्षमतेने सुरु होईल त्यासाठी आमदार आशुतोष काळे सक्षम आहेत.
चौकट - रांजणगाव देशमुख प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कायमस्वरूपी कार्यान्वित राहून या भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न कायमचा सुटावा यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी निवडून येताच १८ फेब्रुवारी २०२० रोजी जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील यांच्या दालनात बैठक घेवून या योजनेकडे त्यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर सहाय्यक मुख्य अभियंता (जलसंपदा उत्तर महाराष्ट्र प्रदेश, नाशिक ) यांनी देखील कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा विकासमहामंडळ यांना दिलेल्या पत्रात त्यांनी आमदार आशुतोष काळे यांनी हि योजना कायमस्वरूपी सुरु ठेवण्यासाठी सर्व प्राकारच्या उपाय योजना कराव्यात अशी मागणी केल्याचे स्पष्ट नमूद केले आहे. - सोनाली रोहमारे.
