थकित वीज बिले तीन टप्प्यात घ्यावी:- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोरोना महामारीच्या संसर्गामुळे सर्वच दैनंदिन जीवन बदलले असून सर्वसामान्यांबरोबरच, मध्यमवर्ग, शेतकरी, उच्चवर्ग आदीं समोर आर्थिक प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहेत अशा परिस्थितीत थकित वीज बिलांचा भरणा करण्यासाठी तीन टप्प्यांची सवलत मिळावी अशी मागणी भाजपचे प्रदेश सचिव सौ स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
त्यांनी आपल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीचा प्रत्येक जण आपापल्या परीने मुकाबला करीत आहे. लॉकडाऊन मुळे दैनंदिन व्यवहार, नोकरी, रोजगार, स्वयं रोजगार, हातावर प्रपंच असणाऱ्या वर्गाचे प्रचंड नुकसान झाले आहे. आर्थिक अडचणींचा प्रत्येकाला सामना करावा लागत आहे, त्यातच पर्जन्यमान कमी अधिक प्रमाणात होत असल्याने त्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे,. वीजबिल आकारणी प्रचंड प्रमाणात झालेले आहे. ही वीज बिले माफ व्हावी म्हणून आम्ही अनेक वेळा मागणी केलेली आहे. वीज बिल भरणा करण्यावरून ग्राहक व अधिकारी यांच्यात रोष निर्माण होत आहे. हा रोष कमी व्हावा तसेच सध्याच्या आर्थिक अडचणीमुळे वीज बिलांचा भरणा करण्यासाठी तीन टप्प्याची सवलत मिळावी म्हणजे त्यांचा वीज ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल असेही सौ स्नेहलता कोल्हे शेवटी म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *