
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोरोना महामारीच्या संकटकाळात जीवाची पर्वा न करता गाव खेडयात, वाडी वस्तीवर जाउन कोरोना आटोक्यात आणण्यासाठी काम करणा-या राज्यातील आशा सेविका हया ख-या कोरोना योध्दया असुन या कठीण परिस्थितीमध्ये जीव धोक्यात घालुन काम करणा-या माताभगिनींना स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी मिळणा-या तुटपुंज्या मानधनाच्या विरोधात संपावर जाण्याची वेळ येते, ही लांच्छनास्पद बाब असुन हे महाविकास आघाडी सरकारचे अपयश असल्याची टीका भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी केली.
वेतनवाढीसाठी तसेच इतर मागण्यांसाठी आशा कर्मचारी व गट प्रर्वतक यांनी 15 जून पासून राज्यव्यापी संप पुकारला आहे. कोपरगाव विधानसभा मतदार संघातील आशा सेविका आणि गट प्रवर्तक महिलांनी आज सौ कोल्हे यांची भेट घेतली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन आशा सेविकांच्या वतीने देण्यात आले.
सौ कोल्हे पुढे म्हणाल्या., आशा सेविकांचे प्रश्न या सरकारने गांभीर्याने घ्यावेत, कोरोना काळामध्ये आशा सेविकांनी केलेल्या कामामुळे प्रशासनाला खूप मोठी मदत झाली आहे. या महामारीच्या काळात हा प्रमुख घटक काम करत असल्याने रूग्णसंख्या आटोक्यात आली. परंतु त्यांच्या मागण्यांकडे हे सरकार दुर्लक्ष करणार असेल तर त्यांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनामुळे राज्यामध्ये रूग्णसंख्या वाढू शकते. आशा सेविकांना या महामारीच्या काळात खूप वेळ काम करावे लागले. या कठिण काळात स्वतःचे घरदार सांभाळून अहोरात्र काम करावे लागले. मार्च 2021 पासून ग्रामीण व शहरी भागामध्ये आशा सेविका व गटप्रवर्तकांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, लसीकरण केंद्र, विलगीकरण कक्ष या ठिकाणी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत काम केले. संशयित रूग्णांच्या तपासण्या करण्याचे कामही करावे लागले. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त बोजा पडत आहे. तरीही त्यांनी स्वतःच्या जीवावर उदार होउन, कुटूंबाची पर्वा न करता राष्ट्रीय कर्तव्य समजून काम केले, कुटूंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी धडपड करणा-या महिलांना त्यांच्या कामाचा मोबदला देण्यासाठी पैसा नसल्याचे सरकार सांगत आहे, ही निशितच दुर्दैवाची बाब असून तुम्हाला न्याय मिळेपर्यंत मी तुमच्या सोबत असल्याची ग्वाही सौ कोल्हे यांनी आशा सेविकांना दिली.
राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री ना.राजेशजी टोपे यांचेशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून या प्रश्नी तोडगा काढून राज्यातील आशा सेविकांच्या मागण्या पुर्ण कराव्यात अशी मागणीही सौ कोल्हे यांनी ना.टोपे यांचेकडे केली आहे.
यावेळी उपस्थित आशा सेविकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. यासरकारने आशा सेविकांची चेष्टा चालविली असुन कोरोना काळातील सर्वच कामे आमच्याकडून करून घेतली जात आहे, परंतु त्या कामाचा मोबदला दिला जात नाही, तीन-चार महिन्याच्या अंतराने मानधन दिले जाते, ती रक्कमही अतिशय नगण्य स्वरूपात मिळते. वास्तविक राज्यभरातील आशा सेविका दारोदार फिरून सर्वेक्षणाचे काम करीत आहे. कामात कुठलीही कुचराई त्यांच्याकडून होत नाही. खेडया पाडयात, वाडया-वस्त्यावर फिरून काम करतांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. काही वस्त्यांवर कुत्रे अंगावर धावून येउन दुखापत झाल्याच्या घटना घडल्या तर साप तत्सम प्रकारचे प्रसंगही आमच्या वाटयाला येतात, त्यावेळी आम्ही एकटया फिरत असल्याने आमच्या मदतीलाही कोणी येत नाही. अशा परिस्थितीतही आम्ही काम करतो आहे, परंतु आम्ही काम करत असतांना सरकारला आमची दया येत नाही. अगदी 33 रूपये दररोजचे मानधन मिळते, मग आम्ही आमचा जीव कशासाठी धोक्यात घालायचा असा प्रश्नही यावेळी आशा सेविकांनी उपस्थित केला.

चौकट-
ताई, या तालुक्यात तुमच्याशिवाय आम्हांला कोणीच वाली नाही. तुम्हीच आमचा प्रश्न तडीस न्या. आशा सेविकांची आर्त विनवणी.
जेव्हा जेव्हा शासनाच्या योजना येतात, तेव्हा तेव्हा आम्हांला कामाला जुंपले जाते. या कामाचा किती मोबदला मिळेल हेही सांगितले जात नाही. आमच्याकडून काम करून घेतले जाते. नंतर 2-4 महिन्यांनी आम्हांला तुटपुंजे मानधन हातावर ठेवतात.
आम्ही काम करायला कधीच नाही म्हणत नाही, वाडया वस्त्यावर फिरून फिरून आमच्या पायाचे तुकडे पडतात. काटेकुटे आम्ही पहात नाही. साप,कुत्रे आडवे आले तरी जीवावर उदार होउन काम करतो.आमच्या इतके प्रामाणिक काम कोणीच करीत नाही. तरीही आमची अवहेलना होत आहे. ताई, आमचा प्रश्न तुम्ही सोडवा या तालुक्यात आम्हांला तुमच्याशिवाय कोणीच वाली नाही.
