
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- गोदावरी कालव्याच्या लाभ क्षेत्रात मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाला असला तरी फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळा जाणवू लागला आहे. त्यामुळे सिंचनासाठी आवर्तन सोडण्यात यावे अशी शेतकऱ्यांची मागणी होती. त्या मागणीची दखल घेवून आ.आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला लवकरात लवकर सिंचनासाठी आवर्तन सोडण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्या सूचनेनुसार आज (सोमवार) पासून गोदावरी उजव्या, डाव्या व नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्याला सिंचनासाठी आवर्तन सोडण्यात येणार आहे.
गोदावरी कालव्याच्या लाभ क्षेत्रात रब्बी हंगामातील गहू, हरबरा,कांदे आदी पिकांबरोबरच इतर सर्वच पिकांना पोषक वातावरण असल्यामुळे सर्व पिके जोमात आहेत.परंतु उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे पिकांना वेळेत आवर्तन उपलब्ध होणे गरजेचे होते. त्यामुळे गोदावरी कालव्यांना लवकरात लवकर आवर्तन सोडण्याबाबत आ.आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला निर्देश दिले होते.
सद्य स्थितीत गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीचे काम प्रगती पथावर असल्यामुळे गोदावरी कालव्यांना आवर्तन सोडण्यात अडचण येत असल्यामुळे सुरू असलेली कालव्यांच्या दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करून वेळेत आवर्तन लवकरात लवकर कसे सोडता येईल याचा गांभीर्याने विचार करण्याच्या सूचना आ.आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार पाटबंधारे विभागाने सुरू असलेल्या कालवा दुरुस्तीच्या कामाला गती देवून सुरू असलेली कामे पूर्ण करून आजपासून म्हणजेच सोमवार (दि.२३) पासून गोदावरी डाव्या,उजव्या व नांदुर मध्यमेश्वर एक्सप्रेस कलाव्याला सिंचनासाठी आवर्तन सोडण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे.त्यामुळे गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या चिंता दूर होवून त्यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
