के. जे. सोमय्या महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” पंधरवडा उत्साहात संपन्न…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
दि.१.१. २०२५ ते १५.१.२०२५ या नववर्षाच्या प्रारंभी प्रत्येक वर्षी “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” हा महाराष्ट्र शासनाने अतिशय स्तुत्य असा उपक्रम अमलात आणला आहे. लोप पावत चाललेली वाचन संस्कृती, मोबाईल, इंटरनेटचा अतिवापर यामुळे माणसाचे मन, बुद्धी, शरीर यावर होणारे विपरीत परिणाम, या सर्वांकडे आरोग्य विभागही आता गांभीर्याने बघत आहे. यासाठीच शासनाने उचललेले हे एक सकारात्मक पाऊल होय. के. जे. सोमय्या महाविद्यालयातही महाराष्ट्र शासनाच्या “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा करण्यात आला. त्यामध्ये ‘मला आवडलेले पुस्तक’ या विषयावर निबंध स्पर्धा व याच विषयावर पुस्तक परीक्षण आपल्या आवडिनुसार , आपल्याच भाषेत हे उपक्रम घेण्यात आले. विजेता स्पर्धकांना दिनांक 26 जानेवारी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. त्याचबरोबर ‘वाचनाचे महत्त्व’ या विषयावर एकदिवशीय कार्यशाळा ही आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेसाठी प्रमुख वक्ते म्हणून नवकवी व लेखक प्रा. अमोल चिने यांनी आपल्या कवितेतून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वाचन किती महत्त्वाचे आहे हेही त्यांनी पटवून दिले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. विजय ठाणगे यांनीही विद्यार्थ्यांना ग्रंथालयातील बहुभाषीय उत्तमोत्तम ग्रंथांची ओळख करून दिली. दिनांक ११.०१.२०२५ ते १५.०१.२०२५ रोजी सर्व विद्यार्थी, प्राध्यापक वृंद तसेच कोपरगावकरांसाठी ‘ग्रंथ प्रदर्शनाचेही’ आयोजन ग्रंथालय विभागामार्फत करण्यात आले होते. ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी को. ता. ए. सोसायटीचे सचिव एस.डी. कुलकर्णी यांच्या समवेत महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. व्ही. सी. ठाणगे उपस्थित होते. यामध्ये विश्वकोश, चरित्रकोश, कथा, कादंबरी, नाटक, खेळ, व्यक्तिमत्व विकास, स्पर्धा परीक्षा आदी विषयावर आधारित ग्रंथांचं प्रदर्शन भरवण्यात आले होते. “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या उपक्रमाची सांगता दि. १५.०१.२०२५ रोजी ग्रंथालयासमोरून ‘ग्रंथ दिंडीने’ करण्यात आली. ग्रंथ दिंडीसाठी को. ता. ए. सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे हे उपस्थित होते. ग्रंथदिंडीसाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक वृंद हे ‘पारंपरिक वेशभूषेत’ सहभागी झाले होते. यावेळी अभंगाच्या नामघोषात व फुगडी खेळत ग्रंथदिंडीला पंढरपूरच्या वारीचेच जणू स्वरूप प्राप्त झाले होते. वाचन संकल्प महाराष्ट्राचा या पंधरवड्याच्या उपक्रमासाठी महाविद्यालयाने एक समन्वयक समितीची स्थापना केली होती. त्यामध्ये डॉ. निता शिंदे (ग्रंथपाल), प्रा. डॉ. जे, एस, मोरे (हिंदी विभागप्रमुख), प्रा. वर्षा आहेर (इंग्रजी विभाग), प्रा. आहेर संपत (मराठी विभाग), प्रा. डॉ. बी. एस. गायकवाड (रा. से. यो. अधिकारी) यांचा समावेश होता. महाराष्ट्र शासनाच्या ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, कार्यालयीन अधीक्षक, ग्रंथालयीन कर्मचारी या सर्वांचे ग्रंथालयाच्या वतीने डॉ. नीता शिंदे (ग्रंथपाल) यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *