
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:-
कमी झालेला कोरोना विषाणूचा धोका मार्च महिन्यापासून पुन्हा वाढत असल्यामुळे राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा डोके वर काढल्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून कोपरगाव विधानसभा मतदार संघात देखील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अडचणीची परिस्थिती निर्माण होऊन नागरिकांना देखील कोरोनाची बाधा होईल या भीतीने नागरिक घराबाहेर पडत नाही. अशा परिस्थितीत नागरिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांना तातडीने रेशनवर मोफत किंवा अल्पदरात अन्नधान्य उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगनरावजी भुजबळ यांच्याकडे दिलेल्या निवेदनात केली आहे.
दिलेल्या निवेदनात आमदार आशुतोष काळे यांनी पुढे असे म्हटले आहे की, कोविड-१९ चा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शासनाच्या वतीने सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहे. कोविड-१९ चा वाढता धोका लक्षात घेऊन शासनाकडून नुकतेच काही निर्बंध घालण्यात आले आहे. याचा परिणाम साहजिकच नागरिकांच्या जीवनावर होत असून आर्थिक अडचणी निर्माण होणार आहेत. मागील वर्षी अचानक करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक गरीब कुटुंबांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांच्या जीवनात अनेक अडचणी निर्माण होऊन त्यांच्यापुढे रोजच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी नागरिकांना रेशनवर अन्नधान्य उपलब्ध झाल्यास नागरिकांना काहीसा दिलासा मिळू शकतो. त्यासाठी मतदार संघातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या नागरिकांसाठी रेशनवर गहू, तांदूळ यांच्याबरोबरच तूरडाळ, चणाडाळ, साखर, खाद्यतेल मोफत किंवा अल्पदरात उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगनरावजी भुजबळ यांच्याकडे केली आहे.
