पाझर तलावात पाणी सोडल्याशिवाय उपोषण मागे नाही, उपोषणास पाठिंब्यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
(रांजणगाव देशमुख):- निळवंडेच्या पाण्याने पाझर तलाव भरून द्यावे या मागणीसाठी कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणला पाठिंबा देण्यासाठी लाभधारक शेतकऱ्यांच्या रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जो पर्यंत कोपरगाव तालुक्यातील पाझर तलावात पाणी सुरू होत नाही तो पर्यंत आमरण उपोषण मागे घेतले जाणार नाही असा इशारा उपोषणकर्त्यांच्या वतीने अँड. योगेश खालकर यांनी रास्ता रोको आंदोलनावेळी दिला. उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून पाठिंब्यासाठी झालेल्या रास्ता रोको आंदोलनावेळी हजारो शेतकरी उपस्थित होते.
अँड. योगेश खालकर, डॉ. अरूण गव्हाणे, गजानन मते मनेगावचे सरपंच आण्णासाहेब गांगवे, कैलास रहाणे, संजय बर्डे आदी शेतकरी मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत आमरण उपोषणावर ठाम आहे. त्यांच्या प्रकृतीची तपासणी वैद्यकिय अधिकारी डॉ. नितीन तुपे यांच्या वैद्यकीय पथकाने केली.
निळवंडेच्या द्वितीय चाचणीतून तळेगाव शाखेला पाणी सोडण्यात आले. एक टिमएसी पाण्याची नासाडी करण्यात आली. जलसंपदा अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे कोपरगाव तालुक्यातील एकाही पाझर तलावात पाणी आले नाही. त्यामुळे परिसरातील शेतकरी संतप्त झाले असून त्यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निळवंडेच्या चाचणीसाठी दीड टिमएसी पाण्याची वाढीव उपलब्धता करून देण्यात आली आहे. मात्र जलसंपदाचे अधिकारी पुन्हा ढिसाळ नियोजन करून लाभक्षेत्र पाण्यापासून वंचित ठेवतील अशी भावना या भागातील शेतकऱ्यांमध्ये झाली आहे.
आंदोलन मागे घ्यावे याची विनंती करण्यासाठी जलसंपदाचे उप- कार्यकारी अभियंता महेश गायकवाड, कोपरगावचे तहसिलदार संदिपकुमार भोसले, शिर्डी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक संदिप शिरसाठ आदी उपस्थित होते. रास्ता रोको आंदोलनानंतर शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासमवेत उप-कार्यकारी अभियंता व तहसिलदार यांनी तालुक्यातील सर्व पाझर तलावात पाणी सोडण्याच्या जागांची पाहणी केली. या पाहणीनंतर जलसंपदा अधिकारी यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र त्यांनी सुचविलेले पर्याय उपोषणकर्त्यांना मान्य नव्हते. त्यामुळे उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोपरगाव तालुक्यातील पाझर तलाव भरून देण्यासाठी प्रथम पाणी सोडावे, शेवटच्या बंधाऱ्या पाणी पोहचवण्यासाठी येणारे सर्व अडथळे दूर करावे आदी मागण्यांसह कालव्यावरील सर्व डोंगळे काढून पाणी चोरी रोखावी या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. या तिन्ही मागण्यांबाबत जलसंपदाचे उप- कार्यकारी अभियंता महेश गायकवाड यांनी असमर्थता दर्शवल्याने उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
रास्ता रोको आंदोलनावेळी शिवाजी शेंडगे, बाळासाहेब गोर्डे, धिरज देशमुख, अँड योगेश खालकर, अनिता खालकर, धनंजय वर्पे, गजानन मते, कैलास रहाणे आदींची भाषणे झाली. रास्ता रोको आंदोलनाचे सुत्रसंचालन सुखलाल गांगवे यांनी केले.
चौकट- उपोषणास पाठिंबा म्हणून शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. जनभावना तिव्र असतानाही प्रशासनाकडून योग्य ती कारवाई व ठोस आश्वासन न दिल्याने उपोषणकर्ते अँड. योगेश खालकर यांनी शनीवार, दि.१८ रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

फोटो ओळ- कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे निळवंडेच्या पाण्यासाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणास रास्ता रोको आंदोलन करून पाठिंबा देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *