
गुरु पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर सावळीविहीर फाटा कोपरगाव
वाहतूकीचे योग्य नियोजन करा
आ. आशुतोष काळेंचे पोलीस अधीक्षकांना पत्र…
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या सावळीविहीर फाटा ते कोपरगाव या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र पुढील आठवड्यात येणाऱ्या गुरु पौर्णिमेला या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ वाढणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सावळीविहीर फाटा ते कोपरगाव या मार्गावर वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी वाहतुकीचे योग्य नियोजन करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना दिलेल्या पत्रात केल्या आहेत.
दिलेल्या पत्रात आ. आशुतोष काळे यांनी पुढे असे म्हटले आहे कि, कोपरगाव विधानसभा मतदार संघात श्री साईबाबा तपोभूमी मंदिर, श्री शुक्लेश्वर मंदिर, राष्ट्रसंत श्री जनार्दन स्वामी समाधी मंदिर, श्री संत जंगलीदास महाराज आश्रम असून शेजारीच काही किलोमीटर अंतरावर जगप्रसिद्ध शिर्डीचे श्री साई समाधी मंदिर आहे. त्यामुळे दरवर्षी गुरु पौर्णिमेला या सर्व देवस्थानच्या ठिकाणी भाविकांची संख्या खूप मोठी असते. सध्या या ठिकाणी १९१ कोटी निधीतून राष्ट्रीय महामार्ग असलेल्या ७५२ जी या सावळीविहीर फाटा ते कोपरगाव या रस्त्याचे काम सुरु आहे. त्यामुळे काही प्रमाणात वाहतूकीला अडचण येणे साहजिक आहे
परंतु त्याबाबत योग्य नियोजन केल्यास हि अडचण सहजपणे दूर होणार आहे. संपूर्ण जड वाहतूक पुणतांबा फाट्यावरून वळविण्यात आली आहे तरी देखील वाहतूक कोंडी होत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा येत आहे. सोमवार (दि.०३) रोजी गुरु पौर्णिमेला मतदार संघातील देवस्थानच्या दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांच्या वाहनांमुळे या रस्त्यावरची वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. तसेच येणाऱ्या साई पालख्या व भाविकांच्या दिंड्यांमुळे मोठी गर्दी होणार आहे. त्यावेळी अशा प्रकारे वाहतूक कोंडी झाल्यास येणाऱ्या भाविकांना त्रास होवून अपघाताची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे गुरु पौर्णिमेला येणाऱ्या भाविकांना वाहतूक कोंडीचा त्रास होवू नये यासाठी सावळीविहीर फाटा ते कोपरगाव या मार्गावर वाहतूक कोंडी होणार नाही त्यासाठी योग्य प्रकारे नियोजन करून वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवावी. तसेच रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे वाहतुकीला अडचण निर्माण होणार नाही यासाठी रस्त्याच्या कामाचे टेंडर घेतलेल्या ठेकेदाराने देखील योग्य काळजी घ्यावी अशा सूचना सबंधित कंपनीचे मॅनेजर एस.ए.यादव यांना आ. आशुतोष काळे यांनी दिलेल्या पत्रात केल्या आहेत.
