

कोपरगाव प्रतिनीधी:-
आज विविध क्षेत्रात महिलां स्वतःला सिध्द करत आहेत, अवकाशापर्यंत झेप घेण्याची तिची क्षमता आहे. यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करून तिने आपण कुठेही कमी नसल्याचे दाखवून दिले आहे. परंतू सध्याच्या परिस्थितीत तीचा संरक्षणाचा विषय ऐरणीवर आला असुन महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याची खंत भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी व्यक्त केली.
जागतिक महिला दिनानिमित्त कोपरगाव मतदार संघातील स्वयंसहायता महिला बचत गटांना कर्जवितरण सौ कोल्हे यांचे हस्ते करण्यात आले. मतदार संघातील विविध गटांना सुमारे 55 लाख रूपयांचे कर्जवितरण केले. यावेळी भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सौ वैशाली साळुंके, शहराध्यक्ष वैशाली आढाव उपस्थित होत्या. याप्रसंगी सौ कोल्हे बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, सन 2002 साली सुरू केलेल्या बचत गटाच्या चळवळीमध्ये आज मोठया प्रमाणात महिला सहभागी झाल्या असुन आज सुमारे 2 हजार 500 गट कार्यरत आहे. यामुळे महिलांना मोठया प्रमाणात स्वयंरोजगाराची संधी निर्माण झाली त्यांच्या जीवनात स्थैर्य प्राप्त झाले आहे. आर्थीक घडी बसली आहे, त्यामुळे तिच्या छोटया मोठया गरजा पुर्ण झाल्या. या माध्यमातून अनेक महिलांनी लघुउदयोग सुरू केले. जवळ जवळ दोन दशकापासून सुरू केलेल्या या सक्षमीकरणाच्या कामात मोठे यश आल्याचे पाहुन समाधान वाटते. भविष्यकाळातही बचत गटाच्या माध्यमातून उत्पादीत केलेल्या वस्तुंना बाजारपेठ निर्माण करून देउन या कामाला आणखी बळकटी देणार असल्याचा मनोदयही सौ कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केला.
वास्तविक स्त्री ही सोशिक असते,तीच्यावर होणारा अन्यायही ती निमुटपणे सहन करते. परंतु या बचत गट चळवळीच्या माध्यमातून तीच्यातील आत्मविश्वास वाढला, हिंमत वाढली, त्यामुळे ती आज पुरूषाच्या खांदयाला खांदा लावुन काम करत आहे. कोणत्याही क्षेत्रात आपण कमी नसल्याचे तीने वारंवार सिध्द केलेले आहे. चुल आणि मुल एवढयापुरतीच ती मर्यादीत राहिली नसुन अवकाशात झेप घेण्यापर्यंतची तीची मजल गेली आहे. महिलांना पाठबळ मिळावे, या दृप्टीकोनातून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी महिलांसाठी अनेक योजना आणल्या. तीला सक्षम करण्यास प्राधान्य दिले. दिवसेंदिवस नारीशक्तीचा सन्मान वाढत असून तीला विविध ठिकाणी आरक्षण दिले जात आहे, परंतु सध्याच्या परिस्थितीत तीच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला असुन महिला संरक्षण या विषयाकडे दुर्लक्ष न करता राज्य सरकारने कठोर उपाययोजना कराव्यात, असेही सौ कोल्हे म्हणाल्या. यावेळी वयोवृध्द बचत गट सदस्या सौ लक्ष्मीबाई सोळसे यांचा सौ कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सौ.साधना पटारे, सौ स्नेहल टेके, सौ सविता ढोमसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
