तुकडेबंदी कायद्यात सुधारणा करणेसाठी शासनाला प्रस्ताव सादर करू – जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले साहेब…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी राहुरी:-
तुकडेबंदी कायद्यात सुधारणा करणेसाठी शासनाला प्रस्ताव सादर करू अशी ग्वाही आज अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. राजेंद्र भोसले साहेब यांनी दिले.


अहमदनगर जिल्हा महसूल विजय सप्तपदी अभियान दि.७ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२१ ची श्रीरामपूर येथील उत्सव मंगलकार्यालय येथे सुरुवात करताना आयोजित कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र राज्य तुकडेबंदी संघर्ष व समन्वय समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांनी मांडलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मा. जिल्हाधिकारी भोसले साहेब बोलत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार लहुजी कानडे, प्रमुख उपस्थिती मध्ये श्रीरामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक, उप नगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील साहेब, उप जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार यांचेसह असंख्य अधिकारी व शेतकरी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना जिल्ह्याधिकारी भोसले साहेब यांनी सांगितले की, आपली मागणी एकदम रास्त आहे, तुकडा ज्या वर्षी पडला त्या वर्षीचे बाजारमूल्य गृहीत धरून त्याचे २५ % आकारणी केल्यास सर्वांना ही बाब सुकर होणार असल्याने आम्ही सदर तुकडेबंदी कायदा दुरूस्ती साठी आपले मागणी वरून तसा प्रस्ताव शासन दरबारी त्वरित सादर करू.
श्रीरामपूर येथील शासकीय विश्राम गृह येथे महाराष्ट्र राज्य तुकडेबंदी संघर्ष समन्वय समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस व सदस्य राष्ट्रीय जल पुरस्कारप्राप्त पत्रकार शिवाजी घाडगे यांनी भेट घेऊन सदरचा प्रश्न मांडला असता जिल्हाधिकारी साहेब यांनी उत्सव मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमस्थळी उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिलेने समितीचे वतीने ढुस व घाडगे यांनी कार्यक्रमास हजेरी लावून सर्वांसमक्ष हा मुद्दा उपस्थित केला. त्यास उत्तर देताना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी शासनाला त्वरित प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रम समारोप प्रसंगी आप्पासाहेब ढुस व शिवाजी घाडगे यांनी समितीची मागणी मान्य केलेबद्दल मा. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *