
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- येणाऱ्या पावसाळ्यात आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होवूच नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. त्यासाठी सर्व विभागांनी योग्य त्या उपाय योजना करून आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.नैसर्गिक संकटामुळे निर्माण होणारी आपत्तीजन्य परिस्थिती आपल्या हातात नसली तरी अशा आपत्तीजन्य परिस्थितीत नागरिकांना वेळेत सर्वोतोपरी मदत मिळाली पाहिजे त्यासाठी योग्य नियोजन करा अशा सूचना श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी विविध शासकीय विभागांना दिल्या.
येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ना. आशुतोष काळे यांनी नुकतीच तहसील कार्यालय कोपरगाव येथे शासनाच्या सर्व विभागानुसार आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेतली.यावेळी विविध विभागांना व आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने निर्माण होणारी परिस्थिती हाताळताना करावयाच्या नियोजनाबाबत सबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
ते म्हणाले की, नागरिकांना आपत्तीच्या वेळी सर्वोतोपरी सहकार्य करणे हे आपले कर्तव्य आहे. ज्यावेळी ग्रामीण भागातील नागरिकांवर आपत्ती ओढवते त्यावेळी नागरिकांना नेमकी मदत कुणाकडे मागायची याबाबत सखोल माहिती त्या नागरिकांना नसते. अशावेळी महसूल, पंचायत समिती व ग्रामसेवक आदी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ त्या नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना धीर देवून परिस्थिती समजावून घेत त्यावर मात करण्यासाठी योग्य नियोजन करावे. जलनिस्सारण विभागाने आजपर्यंत किती कामे पूर्ण केली व किती प्रलंबित आहे याचा आढावा घेवून ते कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. पाण्याचा निचरा करणाऱ्या नैसर्गिक ओढे-नाल्यांची साफ सफाई महसूल व पंचायत समितीने पावसाळ्याच्या आत पूर्ण करून घ्यावी. पावसाळ्यात विजेची समस्या निर्माण होवू नये यासाठी मतदार संघातील विजेचे वाकलेले पोल व लोंबकळत असलेल्या वीज वाहिन्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करा अशा सूचना उर्जा विभागाला दिल्या. पावसाळ्यात साथीचे रोग पसरू नये यासाठी आरोग्य विभागाने पुरेसा औषध पुरवठा प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांवर राहील याची दक्षता घेवून विविध लसींचा साठा देखील पुरेशा प्रमाणात ठेवावा. तहसीलच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने २४ तास सज्ज राहावे. नगरपालिका विभागाने देखील आपला आपत्ती निवारण पथक सज्ज ठेवावे अशा सूचना मुख्याधिकारी प्रशांत गोसावी यांना दिल्या. आपत्ती व्यवस्था योग्य प्रकारे नियोजन करून देखील दुर्दैवाने आपत्ती ओढवली तर त्या आपत्तीमुळे होणारे नुकसान कमी कसे करता येईल व त्या आपत्तीचा नागरिकांना होणारा त्रास कमी कसा करता येईल यासाठी सर्वांनी योग्य काळजी घ्यावी. कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास माझ्याशी किंवा माझ्या यंत्रणेशी तातडीने संपर्क करावा. यदाकदाचित सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाले तर त्या परिस्थितीत देखील पंचायत समिती प्रशासनाने सर्व प्रकारची मदत नागरिकांना लवकरात लवकर मदत पोहोचविण्यासाठी सज्ज राहावे अशा सूचना ना. आशुतोष काळे यांनी यावेळी दिल्या.

याप्रसंगी तहसीलदार विजय बोरुडे, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, बस डेपो मॅनेजर अभिजित चौधरी, पाटबंधारे विभागाचे टी.के. थोरात, महावितरणचे भगवान खराटे, भूषण आचारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे नानासाहेब रणशूर, पंचायत समितीचे कृषी अधिकारी उत्तम पवार, कृषी मंडलाधिकारी अविनाश चंदन, ड्रेनेज विभागाचे उपविभागीय अभियंता किरण तुपे, सब रजिस्ट्रार दिलीप निऱ्हाळी, भूमी अभिलेखचे सुनील कडू, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक सुनील शिंदे, ज्ञानदेव मांजरे, कारभारी आगवण, जिनिंग व प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, राहुल रोहमारे, नानासाहेब चौधरी, नंदकुमार औताडे, भाऊसाहेब भाबड, अनिल दवंगे, रामदास केकाण, सागर केकाण, किरण कुदळे, सर्व मंडलाधिकारी, तलाठी, कृषी मंडलाधिकारी, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.


फोटो ओळ:- आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने निर्माण होणारी परिस्थिती हाताळताना करावयाच्या नियोजनाबाबत सबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ना. आशुतोष काळे.
