मराठी भाषा ही आपल्यावर संस्कार करणारी भाषा:- सौ स्वाती कोयटे,मॅनेजिंग ट्रस्टी…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
भारतात अनेक बोली भाषा आणि प्रमाण भाषा बोलल्या जातात.त्या विविध भाषांमधून विचारांची देवाण-घेवाण करता येते त्या प्रमाणेच महाराष्ट्रात मराठी भाषा बोलली जाते.या भाषेला अनेक वर्षांचा इतिहास असून यातून विचारांची देवाण-घेवाण होत असते तसेच या भाषेमुळे एक आदर्श आणि संस्कारशील व्यक्तीमत्व तयार होते.असे प्रतिपादन समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ स्वाती संदीप कोयटे यांनी केले.
समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये २७ फेब्रुवारी रोजी जागतिक मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला.हा दिवस विद्यार्थ्यांनी मराठी भाषेतील विविध गीतांच्या माध्यमातून मराठी भाषेचा महिमा नृत्य सादर करून आणि मराठीतील लोककलांचा आविष्कार करत उत्साहवर्धक वातावरणात साजरा केला.त्या प्रसंगी समताच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी शिक्षिका सौ सीमा जाधव यांनी केले. त्या म्हणाल्या की,२७ फेब्रुवारी हा दिवस दिल्ली येथील साहित्य अकादमीचा मराठी साहित्याला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणारे कुसुमाग्रज उर्फ वि.वा.शिरवाडकर यांच्या जन्म दिवशी जागतिक मराठी भाषा दिन साजरा करण्यात येत असतो.या दिवसाच्या निमित्ताने मराठी भाषेचा इतिहास आजपर्यंतचा प्रवास आपल्याला समजत असतो.
त्यानंतर मराठी साहित्यातील जेष्ठ साहित्यिक वि.वा.शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मॅनेजिंग ट्रस्टी सौ स्वाती कोयटे व शैक्षणिक संचालिका सौ लिसा बर्धन यांच्या हस्ते करण्यात आले.माध्यमिक विभागातील इ.७ वीच्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेतील विविध गीतांवर ताल धरत नृत्य सादर करून महाराष्ट्रातील मराठी भाषा,संस्कृतीचे दर्शन घडवून दिले. इ.४ थी मधील रुद्र राठोड याने पोतराज, इ.५ वी मधील श्रावणी घारकर हिने बोहरीन,इ.६ वी मधील विद्यार्थिनी राजेश्वरी तांबे हिने वासुदेवाची वेशभूषा परिधान करून लोककलांचा आविष्कार करत उपस्थितांची मने जिंकली.इ.८वी मधील विद्यार्थ्यांनी बदलत्या काळानुसार मराठी भाषेवर आधारित नाटिका सादर केली.विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेचा इतिहास,भाषेतील शब्दांची ओळख यावर आधारित शिक्षिका भक्ती बाभूळके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे,मुख्य कार्यवाह श्री संदीप कोयटे, शालेय पोषण आहार समितीच्या अध्यक्षा सौ सुहासिनी कोयटे यांनी जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त समता स्कूलचे विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी आदींना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इ.६ वी मधील विद्यार्थिनी राजेश्वरी तांबे व शंभवी देशमुख यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपप्राचार्य श्री समीर अत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.उपस्थितांचे आभार शिक्षिका सना सय्यद यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *