
कोपरगांव प्रतिनीधी:-
उन, वारा, पाऊस, थंडी, बर्फ, वातावरणातील बदल इत्यादी यासह असूविधांचा सामना करत डोळ्यात तेल घालून भारतीय मातृभुमिची अखंड सेवा करणान्या सैनिकांमुळेच आपला देश सुरक्षीत असल्याचे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले. अध्यक्षस्थानी भागवतानंद महाराज होते.

श्रीक्षेत्र कोकमठाण येथील ब्रम्हलिन संत रामदासीबाबा समाधी मंदिर तीनखणी कार्यस्थळावर भारतीय सैन्यातील सेवानिवृत्त मेजर, अधिकारी, सैनिकासह २० नवरत्नांनी भेट दिली, त्याप्रसंगी त्यांचा सत्कार करण्यांत आला.


प्रारंभी रामदासीबाबा भक्त मंडळाचे शरद थोरात, बाजार समितीचे माजी सभापती संभाजी रक्ताटे, कोसाका उद्योग समुहाचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम यांनी प्रास्तविक केले. विधीज्ञ महेश भिडे, हभप रामदास महाराज वाघ यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मेजर युवराज गांगवे, मेजर गणेश रक्ताटे यांनी सत्कारास उत्तर दिले.
महंत रामगिरी महाराज पुढे म्हणाले की, सरालाबेलचे नारायणगिरी महाराज यांची दीक्षा सावद्याचे निलगिरी महाराजांनी केली, तर निलगिरी महाराज हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतील सैनिक, या बटालियनचे सारथ्य करणारे सोमेश्वरगिरी. निलगिरी महाराजांना संन्यास दीक्षा देणारे सोमेश्वरगिरीच होते, तेव्हा नेताजींच्या १२५व्या जयंतीदिनी हा अदभूत योगायोग ७२व्या भारतीय प्रजासत्ताक २६ जानेवारी दिनी जुळून आला आणि या कोकमठाण तीर्थक्षेत्री या २० महान विभुतींचा सत्कार आपल्या हातून झाला हे तुम्हा आम्हा. सर्वांचे परमभाग्य आहे. भारतीय सैनिकांची जगात मान उंचावलेली आहे. जगात आज दहशतवाद फोफावत आहे, त्याचा बिमोड करण्यांत आपले सैनिक जीवाची बाजी लावून लढत असतात. घर, दार, कुटुंब सोडुन ही सैनिक मंडळी सीमेवर दक्ष असतात त्यामुळेच आपण निवांत झोप घेऊ शकतो असे ते म्हणाले. शेवटी शरद थोरात यांनी आभार मानले.
