
कोपरगाव प्रतिनिधी:-
के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय चासनळी येथे इयत्ता बारावी विज्ञान व वाणिज्य वर्गाचा सदिच्छा समारंभ व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कोपरगाव ग्रामीण विभाग पोलीस निरीक्षक श्री दौलतराव जाधव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री अशोकराव रोहमारे यांनी भूषविले. यावेळी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे सदस्य श्री चंद्रशेखर कुलकर्णी, श्री संदीप रोहमारे, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य श्री सुजित रोहमारे, के जे सोमय्या वरिष्ठ महाविद्यालय, कोपरगावचे प्राचार्य डॉ. बी..एस. यादव. के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय चासनळीचे प्राचार्य श्री एन. जी.बारे उपस्थित होते.
सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
“सामाजिक कार्यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा व आपले जीवन आदर्श बनवावे, इमानदारी, प्रामाणिकपणा, सामाजिक नीतिमूल्य, विद्यार्थ्यांनी अंगीकारावे व कष्टाशिवाय जीवनात यश नाही.” असे प्रतिपादन यावेळी श्री दौलतराव जाधव यांनी केले.
“डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांसारख्या महान व्यक्तींचा आदर्श विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवावा” असेही ते म्हणाले.
“स्पर्धात्मक युगामध्ये विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विविध व्यावसायिक अभ्यासक्रमात आपला ठसा उमटावा कोपरगाव तालुक्यातील के.जे.सोमय्या महाविद्यालय ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी कर्तव्यदक्ष असते शिक्षणाचे मुख्य ध्येय म्हणजे आदर्श व्यक्ती घडवणे आहे आणि हेच कार्य आपली संस्था पार पाडत आहे.” असे मत यावेळी आपल्या भाषणात प्राचार्य डॉ बी.एस. यादव यांनी व्यक्त केले.
“कोपरगाव तालुक्याच्या शैक्षणिक जडणघडणीत के.जे. सोमय्या महाविद्यालय पूर्वीपासून अग्रेसर आहे तसेच चासनळी व धामोरी या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी म्हणून श्री अशोकराव रोहमारे यांनी माझ्या विनंतीला मान देऊन या भागात महाविद्यालय सुरू केले. व आमच्या भागातील मुलींच्या शिक्षणाची सोय झाली.” असे मत यावेळी श्री चंद्रशेखर कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
यावेळी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे सदस्य श्री संदीप रोहमारे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “विद्यार्थ्यांनी व्यावसायिक कोर्स अभ्यासून आपले जीवनमान उंचावून स्वतःच्या पायावर उभे रहावे. बदलत्या काळाची पावलं ओळखून जीवन जगायला शिकावे.”
“यशस्वी जीवनाचा मंत्र म्हणजे शिस्त. विद्यार्थ्यांनी आयुष्यात नेहमी शिस्तीचे पालन करावे व आपल्या आई वडिलांची स्वप्न पूर्ण करावीत.” ही शिकवण श्री सुजित रोहमारे यांनी विद्यार्थ्यांना दिली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री अशोकराव रोहमारे यांनी इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेत बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या तसेच “चासनळी महाविद्यालयातील विद्यार्थी हे नेहमीच कौतुकाचा विषय असतात.” असेही ते म्हणाले, तसेच “यशाकडे वाटचाल करताना अभ्यासाशिवाय पर्याय नाही व शैक्षणिक गुणवत्ता टिकवणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आमची संस्था नेहमी प्रयत्नशील असते. विशेषतः मुलींच्या शिक्षणाच्या समस्या सोडवण्यात आमची संस्था नेहमी अग्रेसर असते.”
असेही श्री अशोकराव रोहमारे म्हणाले.
आपल्या प्रास्ताविकात प्रा. श्री. बारे सर यांनी सांगितले की “आजचे विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे. आणि त्यांना घडवणे हे आम्ही आमचे आद्य कर्तव्य समजतो. आमचे सर्व प्राध्यापक विद्यार्थ्यांना नेहमीच योग्य मार्गदर्शन करतात. हाच वारसा आम्ही नेहमी पुढे सुरू ठेवू.”
या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर, कर्मचारी, पालक, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
या कार्यक्रमात इयत्ता बारावी विज्ञान व वाणिज्य वर्गातील
सार्थक कटारे, रोहन माळी, साक्षी आवारे, वैष्णवी खिलारी, दीपिका संधान, आयान शेख, सरिता नाजगड, राजश्री गाडे, तेजस्विनी गाडे. या विद्यार्थ्यांनी आपला दोन वर्षाचा शैक्षणिक प्रवास व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्री एस.बी. पवार व कु. साक्षी जेजुरकर यांनी केले.
तर कार्यक्रमाचे आभार प्रा. श्री एस.पी. ढेकळे यांनी व्यक्त केले.
