वारी-कान्हेगाव पाणीपुरवठा योजनेला २२ कोटीची प्रशासकीय मान्यता, महिला भगिनींच्या डोक्यावरचा हंडा कायमचा उतरणार:-ना. आशुतोष काळे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी;-
कोळपेवाडी वार्ताहर :- वारी- कान्हेगाव संयुक्त पाणी पुरवठा योजनेचा वर्षानुवर्षांपासूनचा प्रश्न सोडविणार असा शब्द वारी-कान्हेगावच्या ग्रामस्थांना दिला होता. त्याबाबत केलेल्या पाठपुराव्यातून राज्याचे पाणीपुरवठामंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याकडून काही दिवसांपूर्वी या योजनेला हिरवा कंदील मिळविला होता. या योजनेला लवकरात लवकर निधी मिळावा यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून वारी-कान्हेगाव पाणीपुरवठा योजनेला महाविकास आघाडी सरकारने २२ कोटी ११ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली आहे अशी माहिती श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
मागील काही वर्षापासून कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना रखडल्या होत्या. यामध्ये बहुतांशी गावे हि मोठ्या लोकसंख्येची असल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण वर्षानुवर्षापासून जाणवत होती. विशेषतः महिला भगिणींना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. या गावांपैकी मोठी लोकसंख्या असलेल्या कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील वारी-कान्हेगाव संयुक्त पाणी पुरवठा योजनेचा देखील समावेश होता. मागील काही वर्षापासून प्रलंबित असलेली हि पाणी पुरवठा योजना आजवर अनेक वेळा परत गेली होती. त्यामुळे आमचा पाणी प्रश्न सोडवा असे साकडे वारी-कान्हेगावच्या ग्रामस्थांनी ना. आशुतोष काळे यांना घातले होते. नागरिकांची होत असलेलीं पाण्याची अडचण व महिला भगिनींना पाण्यासाठी करावी लागणारी वणवण कायमची थांबविण्यासाठी ना. आशुतोष काळे यांनी वारी-कान्हेगाव पाणी पुरवठा योजना मार्गी लावणार असल्याचा शब्द एका कार्यक्रमात वारी-कान्हेगावच्या ग्रामस्थांना दिला होता. दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करून या पाणी पुरवठा योजनेला राज्याचे पाणी पुरवठामंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याकडून मंजुरी मिळवत लवकरात निधी मिळून या योजनेचे काम सुरु व्हावे यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून महाविकास आघाडी सरकारकडून २२ कोटी ११ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या पाणी पुरवठा योजनेचे लवकरच काम सुरु होणार असून ना. आशुतोष काळे यांनी दिलेला शब्द पूर्ण करून अत्यंत महत्वाचा पाणी प्रश्न अल्पकाळात सोडविल्याबद्दल वारी-कान्हेगावच्या ग्रामस्थांमध्ये विशेषत: महिला भगिनींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

चौकट :- पाणी प्रश्न हा महिला भगिनींसाठी अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न. पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असल्यास महिलांना अनेक अडचणींचा सामना करून हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. हा त्रास वारी-कान्हेगावच्या महिला मागील अनेक वर्षापासून सोसत असून माझ्या प्रयत्नातून या महिलांच्या डोक्यावरचा हंडा कायमचा उतरणार याचे मोठे समाधान मिळत आहे.
-ना. आशुतोष काळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *