कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- राज्यातील ६ हजार ग्रामपंचायतींना कृषी विभागाकडून स्वयंचलीत हवामान केंद्र देण्यात येणार आहे. त्यामुळे कोपरगाव तालुक्याला नवीन जास्तीत जास्त स्वयंचलित हवामान केंद्र मिळावी यासाठी कृषी विभागाने तातडीने प्रस्ताव पाठवावे अशा सूचना श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी कृषी विभागाला दिल्या आहेत.
आ. आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच तहसील कार्यालय कोपरगाव येथे कृषि विभाग आढावा बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते. यावेळी तहसीलदार विजय बोरुडे, सभापती सौ. पौर्णिमा जगधने, जिल्हा परिषद सदस्या सौ. सोनाली रोहमारे, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे व्हा.चेअरमन सुधाकर रोहोम, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, श्रावण आसणे,कारभारी आगवन, जिनिग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, शेतकरी समन्वय समितीचे सदस्य विजय जाधव, विठठल जावळे, दिलीप शिंदे, तालुका शेतकरी सल्ला समितीचे जयंतराव रोहमारे, दिलीप गोरे, संदीप शिंदे, चांगदेव घुगे, नारायण वलटे, आबासाहेब शिंदे, विजय शिंदे, गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी, पंचायत समितीचे पंडित वाघिरे, तालुका प्रभारी कृषि अधिकारी मनोज सोनवणे मंडळ कृषी अधिकारी चांगदेव जवने, अविनाश चंदन, सुनिल गावित, आत्माचे शैलेश आहेर तसेच शेतकरी उपस्थित होते.
पुढे बोलतांना आ. आशुतोष काळे म्हणाले की, नुकसान भरपाई तसेच पीक विमा नुकसान भरपाई पासून कोणीही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही याची काळजी कृषी विभागाने घ्यावी. शेततळ्याचे अनुदान वर्ग झाले असल्याचे सांगत जास्तीत जास्त योजना ह्या शेतकऱ्यांच्या बांधा पर्यंत पोहचवा त्यासाठी शेतकऱ्याच्या बांधावर जावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा कोणत्याही परिस्थितीत शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहू नये याची दक्षता घ्यावी अशा सूचना त्यांनी कृषी विभागास दिल्या. शासनाच्या विविध योजनांचा व आत्मा अंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय योजनांचा आढावा या बैठकीत आ. आशुतोष काळे यांनी घेतला.
यावेळी तालुका प्रभारी कृषि अधिकारी मनोज सोनवणे यांनी तालुक्यातील रब्बी हंगाम नियोजन तसेच महाडीबिटी पोर्टल बाबत प्रगती याविषयी नुकसान भरपाई माहिती सादर केली. महात्मा गांधी रोजगार हमी योजना, पीक विमा,नुकसान भरपाई तसेच रब्बी हंगामात करावयाचे नियोजन याविषयी माहिती दिली. यावेळी शेतकऱ्यांनी मांडलेल्या समस्यांचे कृषि अधिकारी मनोज सोनवणे यांनी उत्तरे देवून समाधान केले. यावेळी तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रतिनिधी स्वरूपात शेततळ्याचे अनुदान, नुकसान भरपाई, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचे प्रमाणपत्र अशोक राशिनकर, रेखा जाधव, भाऊसाहेब शिंदे यांना आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते देण्यात आले. शासनाच्या मदतीचा लाभ तातडीने मिळवून दिल्याबद्दल तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या वतीने आमदार आशुतोष काळे व तहसीलदार यांचे तालुका समन्वय समितीचे सदस्य विजय जाधव, दिलीप शिंदे, विठठल जावळे यांनी सत्कार केला.
चौकट :- कोपरगाव तालुक्यात पाच मंडलामध्ये पाच स्वयंचलीत हवामान केंद्र आहे. हि संख्या कमी असल्यामुळे पिक विम्याचे निकष लावतांना अडचणी निर्माण होवून मागील अनेक वर्षापासून बहुतांश शेतकरी हवामान आधारित फळबाग पीकविमा योजनेपासून वंचित राहत होते. त्याबाबत आ. आशुतोष काळे यांनी निवडून येताच कृषी विभागाकडे कोपरगाव तालुक्यात स्वयंचलीत हवामान केंद्र वाढवावी अशी राज्यातून सर्वप्रथम मागणी केली होती. त्याबाबत सातत्याने कृषी मंत्री ना. दादाजी भुसे, पालकमंत्री तथा ग्रामविकासमंत्री ना. हसनजी मुश्रीफ यांच्याकडे देखील पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याची कृषी विभागाने दखल घेवून स्वयंचलीत हवामान केंद्र देण्याचा घेतलेला निर्णय कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. हा प्रश्न आ. आशुतोष काळे यांनी मार्गी लावला त्याबद्दल त्यांचे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर आभार.
-विजय जाधव(शेतकरी तालुका समन्वय समितीचे सदस्य)

फोटो ओळ:- कृषी विभागाचा आढावा घेतांना आ.आशुतोष काळे समवेत मान्यवर.
