कोपरगाव प्रतिनिधी :- शिर्डी नगरपंचायत शिर्डी नगरपरिषद व्हावी अशी शिर्डी ग्रामस्थांची अनेक वर्षापासूनची मागणी होती. त्या मागणीची दखल घेवून श्री साईबाबा संस्थानचे नूतन अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी मागील आठवड्यात शिर्डी ग्रामस्थ व शिष्टमंडळासह राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बैठक घेवून तातडीने शिर्डी नगरपंचायतचे नगरपरिषदेत रुपांतर करावे अशी मागणी लावून धरली होती. त्या मागणीची दखल घेवून राज्यशासनाकडून शिर्डी नगरपंचायतीला नगरपरिषद करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. अनेक वर्षापासूनची मागणी आ. आशुतोष काळे यांच्यामुळे पूर्ण होणार आहे त्याबद्दल व श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिर्डीच्या सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी आ. आशुतोष काळे यांचा सत्कार केला आहे.
याप्रसंगी श्री साईबाबा संस्थानचे उपाध्यक्ष जगदीश सावंत, विश्वस्त सचिन गुजर, राहुल कनाल, महेंद्र शेळके, जयंत जाधव, डॉ एकनाथ गोंदकर, सुरेश वाबळे, अनुराधा आदीक, अविनाश दंडवते, अॅड. सुहास आहेर, शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. भाग्यश्री बानायत, उपकार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, निलेश कोते,गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, कैलासबापू कोते, सुजित गोंदकर, कमलाकर कोते, विजय कोते, विजय जगताप, ज्ञानेश्वर गोंदकर, सचिन शिंदे, गणेश कोते, सचिन तांबे, सुनील गोंदकर, सुरज शेळके, संदीप सोनवणे, बाळासाहेब गायकवाड, अॅड. शेजवळ, दीपक गोंदकर, संदीप पारख, आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी सत्काराला उत्तर देतांना आ. आशुतोष काळे म्हणाले की, श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडतांना साई भक्तांचा प्रतिनिधी म्हणून काम करणार असून साई भक्तांच्या अडचणी सोडविणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे देश-विदेशातून येणाऱ्या प्रत्येक साईभक्ताला सुलभ साई दर्शन व उच्च दर्जाच्या सोयीसुविधा देण्यास माझे प्राधान्य राहणार आहे. साई भक्तांना योग्य सोयीसुविधा मिळाल्यास त्यांचे शिर्डीतील वास्तव्य वाढले जाऊन साई भक्त शिर्डीत काही दिवस सहजपणे राहतील व त्याचा फायदा शिर्डीच्या अर्थकारणाला गती मिळण्यासाठी होणार आहे. या दृष्टीकोनातून साई भक्त व शिर्डीचे हित साधण्याचा प्रयत्न करणार आहे. शिर्डी ग्रामस्थांची अनेक वर्षापासुनची शिर्डी नगरपंचायत शिर्डी नगरपरिषद व्हावी हि मागणी पूर्ण व्हावी यासाठी शासन दरबारी केलेल्या प्रयत्नातून साईबाबांच्या आशीर्वादाने यश मिळाले आहे. त्याप्रमाणेच शिर्डीच्या इतरही समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध राहू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

फोटो ओळ:- श्री साईबाबा संस्थानचे नूतन अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांचा सत्कार करतांना शिर्डीचे सर्व पक्षीय पदाधिकारी.
