कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव तालुक्यातील अनेक गावातील पाणीपुरवठा योजनांचे सर्वेक्षण आ.आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यातून पूर्ण झाले आहे. या पाणीपुरवठा योजनांना तातडीने मंजुरी मिळावी यासाठी आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांची भेट घेतली आहे.
कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी, सुरेगाव, कुंभारी, वारी-कान्हेगाव, मळेगाव थडी, मायगाव देवी, जेऊर कुंभारी व शिंगणापूर या गावातील पाणीपुरवठा योजना पूर्ण होऊन पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आ.आशुतोष काळे यांचा पाठपुरावा सुरु असून या पाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळावी यासाठी प्रयत्न करीत आहेत. या गावातील सर्वच पाणीपुरवठा योजना रुपये ५ कोटीच्या पुढे असल्यामुळे या योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे वर्ग केल्या आहेत. मात्र या योजनांना तातडीने मंजुरी मिळावी त्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांची भेट घेतली. वरील गावाबरोबरच जिल्हा परिषदेकडे असणाऱ्या अजूनही सर्वच गावांच्या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी नागरिकांना विशेषतः महिलाभगिनींना पाण्यामुळे होत असलेला त्रास दूर करण्यासाठी या योजनांना तातडीने मंजुरी मिळावी अशी मागणी केली. यावेळी प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून याबाबत तातडीने पुढील कार्यवाही करू अशी ग्वाही दिली असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.
चौकट:- मागील आठवड्यात वारी-कान्हेगाव, जेऊर कुंभारी गावात विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी आ.आशुतोष काळे गेले होते. त्यावेळी ग्रामस्थांनी मागील काही वर्षापासून रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांचे गाऱ्हाणे त्यांच्यापुढे मांडले होते. त्यावेळी या पाणी योजनांचा प्रश्न मार्गी लावण्याचा शब्द आ.आशुतोष काळे यांनी दिला होता. दिलेल्या शब्दाची पूर्तता करण्यासाठी त्यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांची भेट घेतली याबाबत वारी-कान्हेगाव, जेऊर कुंभारीसह ज्या गावातील पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होणार आहे त्या सर्व गावातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

फोटो ओळ:- ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्याबाबत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांच्याशी चर्चा करतांना आ. आशुतोष काळे.
