
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील आवर्तन देण्यासाठी स्वीकारण्यात येणाऱ्या ७ नं. पाणी मागणी अर्जाची मुदत वाढवून द्या अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांना पाठविलेल्या पत्रात दिल्या आहेत.
पाटबंधारे विभागाने काही दिवसांपूर्वी प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करून गोदावरी कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांनी १० नोव्हेंबर पर्यंत ७ नं. पाणी मागणी अर्ज दाखल करावेत असे आवाहन केले होते. मात्र मागील आठवड्यात असलेला दिवाळीचा सण व शेतीच्या मशागतीची कामे करण्यात शेतकरी गुंतल्यामुळे अनेक लाभार्थी शेतकऱ्यांना ७ नं. पाणी मागणी अर्ज दाखल करता येणे शक्य होणार नाही.
७ नं. पाणी मागणी अर्ज दाखल केल्याशिवाय पाटबंधारे विभाग लाभधारक शेतकऱ्यांना आवर्तनाचा लाभ देत नाही. बुधवार (दि.१०) रोजी पाणी मागणी अर्ज करण्याची अंतिम तारीख असून या तारखेपर्यंत सर्वच लाभधारक शेतकरी आपले पाणी मागणी अर्ज दाखल करू शकत नाही त्यामुळे अनेक लाभधारक शेतकरी आवर्तनापासून वंचित राहू शकतात व त्यांचे नुकसान होवू शकते. त्यासाठी ७ नं. पाणी मागणी अर्जाची मुदत वाढवून द्या अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांना पाठविलेल्या पत्रात केल्या आहेत. लाभधारक शेतकऱ्यांनी देखील जास्तीत जास्त ७ नं. पाणी मागणी अर्ज भरावे असे आवाहन देखील आ. आशुतोष काळे यांनी लाभधारक शेतकऱ्यांना केले आहे.
