कोपरगाव प्रतिनिधी
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघाच्या जिरायती गावाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे कालव्याचे पाणी आ.आशुतोष काळे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यातून जिरायती भागात ओढ्याच्या माध्यमातून पोहोचले आहे. परंतु बुधवार (दि.११) रोजी प्रमुख वितरीकाद्वारे हे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचले असून त्यामुळे आनंदी झालेल्या वेस-सोयगाव, काकडीच्या शेतकऱ्यांनी कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर आमदार आशुतोष काळे यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले आहे.
जिरायती ११ गावांना मागील कित्येक दशकांपासून निळवंडेच्या पाण्याची प्रतीक्षा होती. निळवंडे कालव्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर हे पाणी या ११ गावात आणण्यासाठी जुने ओढे-नाले उकरून तर काही ठिकाणी डोंगळे टाकून हे पाणी जिरायती गावात आमदार आशुतोष काळे यांनी पोहोचवून गावतळे, बंधारे, साठवण तलाव भरून देवून नागरीकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविला आहे. त्यामुळे ज्या जिरायती गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून रहावे लागत होते त्या गावांना आता टँकरची गरज राहिली नाही. तरी देखील राज्याचे जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पा.व आमदार आशुतोष काळे याच्या उपस्थितीत वितरीकांच्या कामांचे भूमिपूजन झाल्यापासून वितरीकांची कामे तातडीने कसे पूर्ण होतील व शेतकऱ्यांच्या शेतात वितरिकाद्वारे लवकरात लवकर कसे पाणी पोहोचवता येईल आणि हा जिरायती परिसर कसा सुजलाम सुफलाम करता येईल यासाठी ते बारीक लक्ष ठेवून होते.
ज्या ज्या वेळी या जिरायती भागात ते जात असत त्या त्यावेळी ते आवर्जून वितरीकांच्या सुरु असलेल्या कामाचा आढावा घेत असतात.सुरु असलेल्या वितरिका क्र. ३ व ४ पैकी क्र.०३ च्या वितरीकेचे काम पूर्ण होवून घेण्यात आलेल्या चाचणीत निळवंडे कालव्याचे पाणी कोणताही अडथळा व अडचण न येता पूर्ण क्षमतेने शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण पसरले असून सर्व गावातील शेतकऱ्यांच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी चंद्रकांत पाडेकर, सिकंदर इनामदार, सतीश म्हाळसकर, गिताराम पाचोरे, कारभारी पाचोरे, नजीर इनामदार, सुधाकर म्हाळसकर, जालिंदर कोल्हे, सोमनाथ कोल्हे, दत्तात्रय म्हाळसकर, सोपानराव म्हाळसकर, शिवाजीराव पाडेकर, बाबासाहेब गायकवाड, साईनाथ कोल्हे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
आ.आशुतोष काळेंच्या भगीरथ प्रयत्नाचे फलित —
चौकट :- वितरिका क्र.०३ च्या माध्यमातून आमच्या बांधापर्यंत पाणी आले ते आमदार आशुतोष काळेंच्या भगीरथ प्रयत्नांचे फलित आहे. त्यामुळे आमच्या जिरायती गावातील मागील तीन पिढ्यांची निळवंडेच्या पाण्याची प्रतीक्षा आता कायमची संपली असून येणारा काळ हा समृद्ध असणार आहे. ज्यांच्यामुळे हा दिवस आम्हा शेतकऱ्यांना पहायला मिळाला त्या आमदार आशुतोष काळे यांच्यामुळे आम्हालाच नव्हे तर आमच्या पुढच्या पिढीलाही त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे वेस-सोयगाव,काकडीच्या शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानणे हे आमचे कर्तव्य आहे.-चंद्रकांत पाडेकर शेतकरी
चौकट :- वितरिका क्र.०३ चे काम पूर्ण होवून करण्यात आलेली चाचणी यशस्वी झाली आहे त्यामुळे वितरिका क्र.०३ च्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेती सिंचनाचा प्रश्न कायमचा सुटणार याचे समाधान आहे. वितरिका क्र.०४ चे कामही प्रगतीपथावर असून ते कामही तातडीने कसे पूर्ण होईल हा माझा प्रयत्न आहे. त्यामुळे वितरिका क्र.०४ चे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनाही सिंचनासाठी पाणी उपलब्ध होऊन त्यांचीही प्रतीक्षा संपणार आहे-आमदार आशुतोष काळे.


फोटो ओळ- निळवंडेचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविणाऱ्या आ.आशुतोष काळे यांचा सत्कार करतांना वेस-सोयगाव,काकडीचे शेतकरी.
