
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव पश्चिमेच्या भागाला वरदान असलेल्या उजनी उपसा सिंचन योजनेचे सर्व तलाव गोदावरी उजव्या कालव्याच्या ओव्हरफ्लो पाण्याने भरून द्यावे अशी मागणी भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे
त्यांनी आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, कोपरगाव तालुक्यात चालू वर्षी बहुतांश ठिकाणी पर्जन्यमान कमी आहे. सध्या नाशिक त्रंबकेश्वर भागात चांगल्या प्रमाणात पाऊस होत असल्याने गोदावरी नदीला व कालव्याला मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. उजनी उपसा सिंचन योजनेच्या धोंडेवाडी, वेस, सोयगाव, मनेगाव, अजनापुर हे तलाव भरून मिळiवे म्हणून या भागातील शेतकऱ्यांनी आपल्याकडे मागणी केलेली आहे, हे सर्व तलाव पूर्णपणे भरून मिळाले तर या परिसरातील शेतकऱ्यांना काही प्रमाणात लाभ होईल तसेच या भागातील जनावरांना व नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध होईल. तेव्हा शासनाने तातडीने या मागणीची दखल घेऊन उजनी उपसा सिंचन योजनेचे सर्व तलाव गोदावरी ओव्हरफ्लोच्या पाण्याने भरून द्यावे असे सौ कोल्हे यांनी म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती त्यांनी नाशिक पाटबंधारे कार्यकारी अभियंता, पालकमंत्री हसन मुश्रीफ, मुख्य अभियंता उत्तर महाराष्ट्र जलसंपदा विभाग तसेच जिल्हाधिकारी नाशिक व अहमदनगर यांच्याकडे दिल्या आहेत.
