
कोपरगाव प्रतिनिधी:- “शेवट तो भला, माझा बहुगोड झाला।”
वारकरी संप्रदायातील सुप्रसिद्ध कीर्तनकार वै. ताजोद्दीन बाबा शेख यांचे असे अचानकपणे आपल्यातून जाणं हे अतिशय दुःखद आहे. लौकिकार्थाने त्यांचं आपल्यात नसणं हे जीवाला हुरहूर लावणारं आहे. मात्र अलौकिक दृष्टीने बघता नारदी गादीवर कीर्तन करतांना देह ठेवणे ही साता जन्मांची पुण्याईच म्हणावी लागेल.
जन्माने मुसलमान मात्र कर्म आणि धर्माने ते पूर्णतः वारकरी होते. “बहुत सुकृताची जोडी, म्हणूनी विठ्ठल आवडी।” या संतवचनानुसार त्यांनी भागवत धर्माची सेवा सुरू ठेवली.
“मी एक मुसलमान असून तुम्हा हिंदूंना आवाहन करतो मायबापहो, मांसाहार ,दारू, विडी-तंबाकू-सिगारेट सारखी व्यसनं सोडा. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला. आल्या जन्मात श्रीहरीचं नाम घेऊन जीवन सार्थकी लावा.”
त्यांचा हा उपदेश सशक्त समाजासाठी दिग्दर्शक किंबहुना राष्ट्रीय एकात्मतेची वीण अत्याधिक घट्ट करणारा होता. संत वाङ्ममय तसेच शिवकालीन इतिहासावर ते भरभरून बोलत. त्यांच्या जाण्याने आम्हां वारकरी बांधवांमध्ये एक भावनिक पोकळी निर्माण झाली आहे.
शेवटी इतकंच की, जगद्गुरू तुकोबांच्या वनचनांनुसार
“अंतकाळी नाम आले ज्याच्या मुखा,
तुका म्हणे त्याच्या सुखा पार नाही…”
दि.२७ सप्टेंबर रोजी रात्री ह.भ.प.वै.ताजोद्दीन महाराज शेख. बाबा यांनी नंदुरबार जवळ जामदे गावी कीर्तनात देह ठेवला,
कीर्तन करत मरण येन ही सामान्य गोष्ट नाही.
अंतकाळी नाम आले ज्याच्या मुखा l तुका म्हणे सुखा पार नाही ll
भावपूर्ण आदरांजली
