
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- शिर्डीला येणाऱ्या साई भक्तांची वेळ आणि पैसा वाचला जावा व कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागाचा आर्थिकदृष्ट्या विकास होण्यासाठी मराठवाडा मुक्तीदिनाच्या मुहूर्तावर कोपरगाव-रोटेगाव रेल्वे मार्ग जाहीर करावा अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
कोपरगाव विधानसभ मतदार संघातील रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोपरगाव येथून औरंगाबाद-नांदेड येथे जाण्यासाठी मनमाड येथे जावे लागते. या प्रवाशांना कोपरगाव-रोटेगाव रेल्वेमार्ग झाल्यास सोयीचे होणार असून कोपरगाव-मनमाड-औरंगाबाद या मार्गावरील जास्तीचे एकूण ९४ किलोमीटर अंतर कमी होणार आहे. त्यामुळे कोपरगाववरून नांदेड- औरंगाबाद येथे जाणारे व औरंगाबाद व नांदेड वरून कोपरगाव-शिर्डीला येणाऱ्या रेल्वे प्रवाशांचे आर्थिक हित साधले जाऊन त्यांचा वेळ देखील वाचणार आहे. कोपरगाव विधानसभा मतदार संघातील नागरिकांची अनेक दिवसांची कोपरगाव-रोटेगाव रेल्वे मार्गाची मागणी आहे. हा रेल्वेमार्ग अस्तित्वात आल्यास कोपरगाव तालुक्यातील तसेच मराठवाड्याच्या सीमेवरील वैजापूर तालुक्यातील अनेक दुष्काळी गावांना या रेल्वेमार्गाचा फायदा होऊन येथील नागरिकांच्या आर्थिक अडचणी सुटण्यास मदत होणार आहे. या मार्गावरच उक्कडगाव रेल्वे स्टेशन प्रस्तावित असून या रेल्वे स्टेशनमुळे परिसरातील दळणवळण वाढून स्थानिक बेरोजगारांचे रोजीरोटीचे प्रश्न मार्गी लागणार आहे.
१७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीदिन असून त्या दिवशी कोपरगाव-रोटेगाव रेल्वे मार्ग जाहीर करून मराठवाडा व कोपरगाव विधानसभा मतदार संघातील नागरिकांना मुक्तिदिनाची भेट द्यावी. हा रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई-पुणे–नाशिक-औरंगाबाद असा औद्योगिक तारांकित चौकोन तयार होईल. औरंगाबादवरून मुंबईला जाणाऱ्या रेल्वेगाड्या कोपरगाववरून शिर्डीकडे वळवून अतिरिक्त कनेक्टीव्हिटी देता येईल त्यामुळे कोपरगाव या चारही महानगरांच्या मध्यावर येऊन कोपरगाव मतदार संघ व परिसराचा विकास साधला जावून कोपरगावच्या बाजापेठेला चालना मिळणार आहे.तसेच मराठवाडा व दक्षिणेकडील राज्यातून शिर्डीला येणाऱ्या भाविकांची सोय होणार आहे. त्यामुळे मराठवाडा मुक्तीदिनी कोपरगाव-रोटेगाव रेल्वे मार्ग जाहीर करावा असे आ.आशुतोष काळे यांनी दिलेल्या पत्रात शेवटी म्हटले आहे.
