
कोपरगाव प्रतिनीधी:- भारतीय लोकशाहीमध्ये मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क असतो . त्याप्रमाणेच एक नियंत्रित व्यवस्था तयार होत असते . त्यातून देशाचा , राज्याचा कारभार चालविणे सुकर होते . बालवयातच नेतृत्व गुण विकसित होणे हि मिळालेली एक अनमोल संधी असून या संधीचा समताच्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी फायदा घेऊन स्वतःतील नेतृव गुण विकसित करावे आणि स्वतःच्या जीवनाला एक नवीन कलाटणी देण्याचे काम देखील नेतृत्व करत असते . असे मत शिर्डी येथील प्रसिद्ध मानस शास्त्रज्ञ पदग्रहण समारंभाचे प्रमुख पाहुणे श्री. ओंकार जोशी यांनी व्यक्त केले भारतीय लोकशाहीचे आधारे समता इंटरनॅशनल स्कूल मध्येही प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांचे मतदान घेऊन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी प्रतिनिधींची निवडणूक घेण्यात आली . त्यामध्ये इयत्ता ९ वी तील विद्यार्थी अथर्व बेरगळ आणि दिवा सांड या दोघांची मुख्य प्रतिनिधी म्हणुन मतदानाच्या आधारे निवड झाली . सहाय्यक मुख्य प्रतिनिधी म्हणुन अंश शिंदे , इशिका वर्मा , शैक्षणिक प्रतिनिधी म्हणुन गणेश गवळी , सहाय्यक प्रतिनिधी सिद्धांत मिलानी , सास्कृतिक कार्यक्रम प्रतिनिधी संजना बिभूते , सहाय्यक कार्यक्रम प्रतिनिधी अनय देशमुख , शिस्त प्रतिनिधी म्हणुन तनुष्का राजेभोसले , सहाय्यक शिस्त प्रतिनिधी नक्षत्रा जपे , स्वच्छता प्रतिनिधी भावेश बोथरा , सहाय्यक स्वच्छता प्रतिनिधी कृष्णा गुप्ता , क्रीडा प्रतिनिधी कामरान अत्तार , सहाय्यक क्रीडा प्रतिनिधी अजिंक्य वाथोरे आदींची निवड विविध पदांवर लोकशाही पद्धतीने झाली . पदग्रहण समारंभात निवड करण्यात आलेल्या प्रतिनिधींना ९ ऑगस्ट २०२१ रोजी पदग्रहण समारंभाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिर्डी येथील सुप्रसिध्द मानसशास्त्रज्ञ डॉ.ओंकार जोशी व समता स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे यांच्या हस्ते निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून विविध पदाचा पदभार देण्यात आला . प्रमुख पाहुण्यांचा परिचय स्कूलच्या शैक्षणिक संचालिका सौ.लिसा बर्धन यांनी करून दिला तर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार स्कूलच्या ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे यांच्या हस्ते करण्यात आला . प्रसंगी निवड झालेल्या प्रतिनिधींनी पदभार स्वीकारल्यानंतर ड्रमच्या तालावर मार्च पास सादर केला . शिक्षिका सौ.शोभा चव्हाण यांनी सर्व प्रतिनिधींकडून पदग्रहणाची शपथ वदवून घेतली . माध्यमिक विभागप्रमुख सौ.शिल्पा वर्मा यांनी पदग्रहण कार्यक्रमाची माहिती देऊन कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले . तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे म्हणाल्या कि , ‘ एखाद्या पदावर निवड झाल्यानंतर त्या पदाची जबाबदारी स्वतःहून पुढाकार घेऊन पार पाडावी लागते . त्यामुळे निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःच्या कार्यक्षमतेनुसार मिळालेल्या पदावरून काम करताना समता स्कूलचे नियम , शिस्त यांना विशेष प्राधान्य देऊन खेळीमेळीच्या वातावरणात दिलेली जबाबदारी पार पाडावी . स्कूलचे माजी प्रतिनिधी चि.सिद्धांत जोशी व राजहंस आढाव यांनी प्रातिनिधिक स्वरुपात मनोगत व्यक्त करून मागील वर्षी आलेले अनुभव कथन करत निवड झालेल्या प्रतिनिधींनी प्रामाणिकपणे मिळालेल्या पदावरून जबाबदारीचे भान ठेऊन दिलेली जबाबदारी पार पाडावी असे सांगितले . मुख्य प्रतिनिधी म्हणून निवड झालेल्या अथर्व बेरगळ व दिवा सांड यांनीही मनोगत व्यक्त करताना मनोगतातून २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील कार्यपद्धतीची रूपरेषा सदर केली . तसेच राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळविलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता ९ वीच्या आदिती खालिया व संस्कृती कदम यांनी केले . समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे , मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे , मुख्य कार्यवाहक संदीप कोयटे , व्यवस्थापन मंडळ , शैक्षणिक संचालिका सौ . लिसा बर्धन , उपप्राचार्य श्री.समीर अत्तार यांनी पदग्रहण स्वीकारलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या . उपप्राचार्य श्री.समीर अत्तार यांचे मार्गदर्शनाखाली पदग्रहण समारंभ यशस्वितेसाठी शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी आदींची विशेष परिश्रम घेतले . उपस्थितांचे आभार शिक्षक संग्राम ताम्हाणे यांनी मानले .
