
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहर विकासाची कामे झालीच पाहिजे, अशी आमची कायमच भूमिका राहिलेली आहे, तेव्हा काळेगटाच्या नगरसेवकांनी शहर विकासाच्या नावाखाली दिशाभूल करू नये, वैशिष्ट्यपूर्ण पाच कोटी रुपयांच्यi निधी बाबत आमदार आशुतोष काळे यांचा सुतराम संबंध नाही, राज्यातील प्रत्येक नगरपालिकांना शासन अशा प्रकारचा निधी वितरित करीत असते, तेव्हा काळे गटाच्या नगरसेवकांनी उगाचच शहर विकासाचा पुळका दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये असे प्रतिपादन उपनगराध्यक्ष आरिफ कुरेशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे
त्यांनी पुढे म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षात आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराच्या विकासासाठी एक रुपयाचाही निधी दिलेला नाही. उलट माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी त्यांचे कार्यकाळात कोपरगाव नगरपालिका इमारत, पाणीपुरवठा योजना, नाट्यगृह, बस स्थानक, पोलीस स्टेशन, बाजारओटे, अग्निशमन इमारत, इत्यादी प्रकारच्या विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणून ही कामे मार्गी लावलेले आहेत. आमदार आशुतोष काळे व त्यांच्या नगरसेवकांनी यापूर्वीही 14व्या वित्त आयोगाच्या निधीबाबत त्यांचा सुतराम संबंध नसताना त्याचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता, त्याची पोलखोल आम्ही यापूर्वीच केलेली आहे. नगरपालिका ताब्यात असो नसो अगर आमदार सत्ताधारी किंवा विरोधी असले तरी राज्यातील महाराष्ट्र शासन हे वैशिष्ट्यपूर्ण निधीतून पाच ते दहा कोटी रुपयांचा निधी वितरीत करीत असते व त्यातून शहर विकासाची कामे होत असतात, तेव्हा आमदार आशुतोष काळे व त्यांच्या समर्थकांनी स्वतःची खोटी प्रसिद्धी, लोकप्रियता वाढवण्यासाठी जनतेची दिशाभूल होईल अशी कुठलेही निवेदने प्रसिद्धीस देऊ नये असे उपनगराध्यक्ष आरिफ कुरेशी शेवटी म्हणाले.
