
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे शेती सिंचनासाठी एक रब्बी व दोन उन्हाळी आवर्तनाचा लाभ गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील सर्वच शेतकऱ्यांना मिळालेला आहे. मतदार संघात निर्माण झालेल्या पिण्याच्या पाण्याची पाणी टंचाई दूर करण्यासाठी चालू सिंचन वर्षात पिण्याच्या पाण्यासाठी गुरुवार (दि.२२) रोजी गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यांना पाणी सोडण्यात येणार आहे. या आवर्तनातून सर्व पाणी योजनांचे साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून घ्यावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.
पावसाळा सुरु होवून जवळपास दोन महिने होत आहे मात्र जिल्ह्याच्या इतर तालुक्याच्या तुलनेत कोपरगाव तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे संपूर्ण मतदार संघातील पाणी पुरवठा योजनांच्या साठवण तलावांनी तळ गाठायला सुरुवात केली होती. त्यामुळे कोपरगाव शहरासह अनेक गावात पाणी कपात केल्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. गोदावरी डाव्या-उजव्या कालव्यावर अवलंबून असणाऱ्या अनेक गावच्या स्थानिक ग्रामपंचायतींनी पिण्याच्या पाण्याचे साठवण तलाव भरण्यासाठी आवर्तन मिळावे अशी मागणी आ. आशुतोष काळे यांच्याकडे केली होती. त्या मागणीची व कोपरगाव शहरात निर्माण झालेल्या पिण्याच्या पाणी टंचाईची दखल घेवून आ.आशुतोष काळे यांनी निर्माण झालेली पाणी टंचाई पाटबंधारे विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊन गांभीर्याने दखल घेण्याचे आदेश देऊन गोदावरी डाव्या-उजव्या कालव्यावर अवलंबून असलेल्या पाणी योजनांचे साठवण तलाव भरण्यासाठी आवर्तन सोडण्याची मागणी केली होती.
त्या मागणीनुसार गुरुवार (दि.२२) पासून गोदावरी डाव्या-उजव्या कालव्यांना वर्षातील पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्याचा पाटबंधारे विभागाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार डाव्या-उजव्या कालव्यांना नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून चालू सिंचन वर्षातील पिण्याच्या पाण्याचे आवर्तन उजव्या कालव्यास तात्पुरत्या स्वरूपात ३०० क्युसेस व डाव्या कालव्यास २०० क्युसेसने पाणी सोडण्यात येणार असून नंतर पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात येणार आहे. लहरी पावसाचा भरवसा नाही त्यामुळे अजून पाऊस किती दिवस वाट पहायला लावणार हे सांगता येणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त दिवस पाणी पुरेल एवढा पाणीसाठा साठवण तलावात होणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व पाणी पुरवठा साठवण तलाव पूर्ण क्षमतेने काळजीने भरून घ्यावे असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.
ओव्हर फ्लोतून सिंचनासाठी आवर्तन मागू
चौकट :- पिण्याच्या पाण्याचे आवर्तन साधारण १० ते १२ दिवसात पुर्ण होईल. धरण लाभक्षेत्रात मागील दोन दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुरु असतांना दरम्यानच्या काळात कोपरगाव तालुक्यात पुरेसा पाऊस न झाल्यास शेतीसाठी आवर्तनाची गरज भासल्यास ओव्हरफ्लो मधून शेतीसाठी आवर्तनाची मागणी जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील यांच्याकडे करणार आहे. – आ. आशुतोष काळे.
