
कोपरगाव प्रतिनिधी:-
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या चरणी आषाढी एकादशी निमित्ताने भाविक नतमस्तक होतात. याच शुभदिनाचे औचित्य साधून कोपरगाव शहरातील अंबिका तरुण मित्रमंडळाने तुळशीची रोपे आणि राजगिरा लाडूचे वाटप करून सामाजिक उपक्रम राबविला.

कोविड संकटात प्राणवायूची होत असलेली कमतरता लक्षात घेऊन सर्वात जास्त प्राणवायूची निर्मिती करणारी आणि अध्यात्मात अनन्यसाधारण महत्व असलेल्या सुमारे पावणे तीनशे तुळशी रोपांचे आणि साडेतीनशे राजगिरा लाडू पाकिटांचे मोफत वाटप शहरातील अंबिका चौक परिसर, जिजामाता उद्यान परिसर, भारत प्रेस रस्ता, राघोबादादा वाडा, वि.दा. सावरकर चौक, हेरंब अपार्टमेंट परिसरात करण्यात आले. प्रारंभी विठ्ठल-रखुमाई मूर्तीचे पूजन अंबिका तरुण मित्रमंडळाचे अध्यक्ष गोपीनाथ गायकवाड व उषा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर युवा नेते शुभम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वरील वाटप करण्यात आले. यावेळी वाल्मिक गोसावी, संजय ठाकूर, ऋषीकेश गोसावी, निखील तांबे, नंदन वाघमारे, गोपीनाथ गायकवाड, राहुल आदमाने, किरण सूर्यवंशी, शंकर येलमामे, संकेत अधिकार, हेमंत गोसावी, रामदास शिंदे, प्रसाद पांडे, फरदीन बेग, तन्मय गायकवाड, अभिषेक गायकवाड आदी उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल प्रभाग पाचसह शहरवासियांतून कौतुक होत आहे.
