
कोपरगाव प्रतिनिधी:-
जिल्हा परिषदेच्या शाळा आज सुरू झाल्या… पण किलबिलाटाशिवाय. ऐरवी विद्यार्थ्यांचा ओसंडून वाहणारा उत्साह, मित्र मैत्रीणींच्या भेटीची ओढ, नव्या पुस्तकांचा अनोखा सुगंध, नवा वर्ग, नवा गणवेश … असं नेहमीचं चित्र यावेळी दुर्दैवाने दिसलं नाही. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर खबरदारी म्हणुन आज विद्यार्थ्यांशिवाय शाळा सुरू करण्यात आल्या. आज शाळेच्या पहिल्याच दिवशी तालुक्यातील चांदेकसारे, पोहेगाव, सोनेवाडी येथील जिल्हा परिषद शाळांना भेटी दिल्या. सरपंच, मुख्याध्यापक, शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामसेवक यांचेशी चर्चा करून स्थानिक परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांबाबत माहीती दिली.

सुमारे तीन महीन्यांपासुन बंद असलेल्या शालेय परिसराची साफसफाई आठवडभरापासुन सुरू होती. आज ग्राम पंचायतीच्या वतीने वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी शाळेत हॅण्डवाॅश स्टेशन्स आहेत, ती अधिक चांगली करणे. ज्या ठिकाणी हॅण्डवाॅश स्टेशन नाहीत अशा ठिकाणी ती नव्याने उभारणे. शिवाय मुलामुलींसाठी असणारी शौचालये दुरूस्त करून घेणे याबाबत आवश्यक तरतुद केली आहे, त्यानुसार ही कामे प्राधान्याने करण्याच्या सुचना दिल्या.
अनेक शाळांमध्ये संगणक, प्रोजेक्टर, इ साहीत्य दुरूस्तीअभावी धुळ खात पडून आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती इतक्यात निवळण्याची शक्यता नसल्याने डिजीटल साधनांद्वारे अध्यापन करणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा साहित्याची दुरूस्ती करणे तसेच गरजेनुसार नव्याने उपलब्ध करून घेणे आवश्यक आहे. अखंडित वीजपुरवठा, इंटरनेट कनेक्टीवीटी याबाबींची उपलब्धता यासाठी शालेय स्तरावर ठोस तरतूद करावी लागणार आहे. अॅन्ड्राॅईड मोबाईलची अनुप्लब्धता हा ग्रामीण भागातील पालकांना भेडसावणारा महत्वाचा प्रश्न आहे. गतवर्षी जिल्हा परिषदेने विकसित केलेल्या स्वाध्याय पुस्तिका तसेच शिक्षकांनी दिलेल्या गृहभेटी यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता आले. यावर्षी आणखी एक पाऊल पुढे टाकत डिजीटल अध्यापनासाठी आवश्यक कौशल्ये शिक्षकांना आत्मसात करावी लागणार आहेत. सततच्या सुट्या, मोबाईल-टीवीचा अतिवापर यामुळे मुलांच्या भावविश्वात प्रचंड बदल घडून आले आहेत. अशावेळी त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोठीच कसरत करावी लागणार आहे.
अनेक ग्राम पंचायतीनी केंद्रीय वित्त आयोग निधीच्या माध्यमातुन गावातील जिल्हा परिषद शाळांचे रूपडे पालटले आहे. सद्यस्थितीत ग्राम पंचायत आणि लोकसहभाग याद्वारे शाळांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजित आहे. आज काही तंत्रस्नेही शिक्षकांशी चर्चा करून त्यांची डिजिटल शिक्षण प्रणाली संदर्भात मते जाणुन घेतली.
कोरोनाचा उद्रेक शमल्यानंतर पुन्हा लवकरच शाळा गजबजतील…
शब्दांकन : सचिन सुर्यवंशी
गटविकास अधिकारी,पंचायत समिती कोपरगाव
