शेतकरी हिताचा विचार करून जिल्ह्यातील बाजार समित्या तातडीने सुरू करा:-भारतीय जनता पार्टी प्रदेश सचिव,माजी आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे यांची जिल्हाधिकारी यांचेकडे मागणी…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
शासन कोरोना महामारीमुळे जिल्ह्यातील बाजार समित्या वारंवार बंद करीत असल्यामुळे शेतकरी बांधवांनी मोठ्या कष्टाने पिकविलेला कांदा विकावा कसा या विवंचनेत शेतकरी सापडलेले असून आधीच गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊन मुळे कांदा पिकाला योग्य भाव मिळालेला नाही तसेच सर्व शेतकरी बाधवांकडे उत्पादित केलेला कांदा साठविण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने आता पावसाळा येऊन ठेपलेला असताना कांद्याचे करायचे काय असे मोठे संकट शेतकऱ्यांपुढे आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यामधील कांद्याचे व भुसार मालाचे लिलाव तातडीने सुरु करावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव ,माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
देशामध्ये गेल्या एक ते दीड वर्षांपासून कोरोना महामारीने थैमान घातलेले असून या महामारीमुळे शेतकरी बांधव प्रचंड आर्थिक संकटात सापडलेला असताना आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही शेतकरी बांधवाना याचा मोठा फटका बसलेला आहे .गेल्या वर्षी राज्यात चांगल्या प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे शेतकरी बांधवांनी उसासह कांदा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती,मात्र कोरोनाचा प्रसार वाढल्यामुळे आणि शासनाच्या वारंवार बाजार समित्त्या चालू बंद करण्याच्या धोरणामुळे त्याच्या अडचणीत भरच पडलेली आहे.
आता शासनाने बाजार समित्या चालू केल्या मात्र कांदा लिलाव अद्यापही जिल्ह्यातील बऱ्याच बाजार समित्यांममध्ये बंद आहे.कांदा लिलावात गर्दी होऊन त्यातून कोरोनाचा प्रसार होण्याचे कारण देऊन कांदा लिलाव बंद ठेवले आहे त्यामुळे शेतकरी बांधवाना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.सध्या पावसाचे दिवस आल्याने अजूनही बहुतेक शेतकरी बांधवांचे कांदा पीक सुरक्षित ठिकाणी कांदा चाळीत पूर्ण साठवलेले नाही ,वादळ वाऱ्यामुळे व पावसामुळे जर कांदा पीक भिजले तर त्यांना कोणीच वाली नाही त्यामुळे जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव पूर्ण क्षमतेने सुरू करणे गरजेचे आहे.
आधीच शेतकरी अवकाळी पावसाने खचलेला असून नुकसान झालेल्या पिकांची भरपाई देखील मिळालेली नाही यातच सुमारे महिनाभरापासून कांदा लिलाव बंद असल्याने संकटात सापडलेला शेतकरी आता मात्र हवालदिल झालेला आहे त्यामुळे शासनाने त्वरित जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव सुरू करून अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज असल्याचे सौ कोल्हे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *