
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील मौजे कान्हेगाव येथील हनुमानवाडी भागातील नागरिकांच्या दैनंदिन दळणवळणाच्या गंभीर प्रश्नाला अखेर दिलासा मिळाला आहे. कान्हेगाव व हनुमानवाडी हे एकाच गावाचे दोन भाग असतानाही मधून जाणाऱ्या दौंड–मनमाड रेल्वेमार्ग या दुहेरी रेल्वेमार्गामुळे गावाचे भौगोलिक विभाजन झाले आहे. परिणामी नागरिकांना रोजच्या कामकाजासाठी जीव धोक्यात घालून रेल्वे क्रॉसिंग ओलांडावी लागत होती.
सध्या रेल्वे प्रशासनाकडून मार्गालगत संरक्षक कंपाऊंड उभारण्याचे काम सुरू असल्याने पारंपरिक ये-जा मार्ग बंद होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकरी, कामगार, विद्यार्थी व महिलांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागणार होता. विशेषतः रात्रीच्या वेळी आजारी रुग्ण किंवा गरोदर महिलांना दवाखान्यात हलविताना जीवितास धोका निर्माण होण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली होती.
हनुमानवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत कार्यालय असल्याने लहान मुलांना दररोज रेल्वेमार्ग ओलांडून जावे लागत होते. पर्यायी मार्ग २ ते ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या रेल्वे चौकीमार्गे उपलब्ध असला तरी तो नागरिकांसाठी अव्यवहार्य ठरत होता.
या पार्श्वभूमीवर मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी भारतीय रेल्वे अधिनियम कलम १६ नुसार लोकवस्ती विभाजित झाल्यास आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असल्याचे निदर्शनास आणून देत हनुमानवाडी येथे रेल्वेच्या खर्चातून सुरक्षित बोगदा उभारण्याची ठाम मागणी शासनाकडे केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून शासन व रेल्वे प्रशासनाने बोगदा उभारण्यास अधिकृत परवानगी दिली आहे.सर्वसाधारण आराखड्यासह पुढील इतर परवानगी प्रक्रिया पार होऊन लवकरच काम मार्गी लागेल अशी अपेक्षा आता व्यक्त करण्यात येत आहे.
सदर बोगदा उभारल्यास विद्यार्थ्यांची सुरक्षितता, नागरिकांचे दैनंदिन जीवन तसेच आपत्कालीन सेवा सुरळीत होण्यास मोठी मदत होणार आहे. हा दीर्घकालीन आणि जटिल प्रश्न मार्गी लागल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून काम तातडीने पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
