कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या कोपरगाव-वैजापूर (रा.मा.-६५) वरील श्री साईबाबा कॉर्नर ते रेल्वे स्टेशन या रोडची अत्यंत दयनीय अवस्था झाल्यामुळे या रस्त्यासाठी निधी मिळावा यासाठी आ.आशुतोष काळे यांचा पाठपुरावा सुरु होता.त्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून श्री साईबाबा कॉर्नर ते रेल्वे स्टेशन या रस्त्यासाठी २० कोटी तर कोपरगाव तालुक्याच्या पूर्व संवत्सर-भोजडे-धोत्रे रस्ता (प्रजिमा-५) कोळ नदीवरील पुलासाठी ०७ कोटी निधी असा एकूण २७ कोटी निधी केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत (सीआरआयएफ) मधून मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव मतदार संघाच्या विकासाला निधी मिळविण्यासाठी ज्या योजनेतून निधी मिळविता येईल त्या योजनेत मतदार संघातील विविध विकासकामे बसवून निधी मिळावा यासाठी आ.आशुतोष काळे यांचा राज्य व केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरु असतो.अशाच पाठपुराव्यातून सावळीविहीर-कोपरगाव या राष्ट्रीय महामार्गासाठी त्यांनी केद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री ना.नितीनजी गडकरी यांची दिल्ली येथे वेळोवेळी भेट घेवून त्यांच्या सहकार्यातून १९१ कोटी निधी आणून या रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. त्याप्रमाणेच ज्या रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत त्या रस्त्यांच्या कामांना पण लवकरच निधी मंजूर होणार असल्याचे सुतोवाच यापूर्वी आ.आशुतोष काळे यांनी जाहीर कार्यक्रमाच्या माध्यमातून केलेले होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे केंद्र शासनाने त्यांच्या पाठपुराव्याची दखल घेवून केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत (सीआरआयएफ) कोपरगाव-वैजापूर (रा.मा.-६५) या श्री साईबाबा कॉर्नर ते रेल्वे स्टेशन रस्ता या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या रस्त्यासाठी २० कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे या रस्त्याने नियमितपणे ये-जा करणाऱ्या शाळा-महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना, कोपरगाव रेल्वेस्टेशन कडे जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांसाठी तसेच कोपरगाव वरून शिंगणापूर, पढेगाव,कासली या मार्गे वैजापूरला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
तसेच कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील संवत्सर-भोजडे-धोत्रे रस्ता (प्रजिमा ५) कोळ नदीवरील पुलासाठी धोत्रे-भोजडे गावाला जोडणारा कोळ नदीवर जवळपास पाच दशकापूर्वीचा असणारा जुना सिमेंट पाईपचा पूल वाहून गेल्यामुळे पावसाळ्यात भोजडे, वारी, आदी गावातील नागरीकांचे, शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्याचे, तसेच कोपरगाव शहरात शेतमाल विक्रीसाठी घेवून जाणाऱ्या शेतकऱ्यांचे हाल होत होते. त्यामुळे हा पूल नव्याने बांधण्यात यावा अशी या भागातील नागरिकांची मागणी होती. त्या मागणीची दखल घेवून आ.आशुतोष काळे यांनी या पुलासाठी निधी मिळावा यासाठी प्रस्ताव दाखल करून पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्यातून या पुलाला देखील केंद्र शासनाने सीआरआयएफ मधून ०७ कोटी निधी या पुलासाठी मंजूर केला आहे.या ०७ कोटीच्या पुलाच्या निर्मितीतून पूर्व-पश्चिम भाग व कोपरगाव-वैजापूर तालुका एकमेकांना जोडला जावून धोत्रे, तळेगाव, खोपडी,संवत्सर आदी गावातील शेतकरी, विद्यार्थी नागरिकांच्या अडचणी कायमच्या कमी होणार आहे.
त्याबद्दल आ.आशुतोष काळे यांनी केद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री ना.नितीनजी गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे कोपरगाव मतदार संघातील नागरीकांच्या वतीने आभार मानले आहे.

फोटो ओळ- केद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री ना.नितीनजी गडकरी यांची भेट घेवून श्री साईबाबा कॉर्नर ते रेल्वे स्टेशन रस्ता (रा.मा.-६५) या रस्त्यासाठी व कोळ नदीवरील पुलासाठी निधी मिळावा याबाबत आ.आशुतोष काळेंनी निवेदन दिले होते.
