
कोपरगांव तालुक्यातील डाऊच बुद्रुक मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ह.भ.प.मनसुख महाराज दहे यांचे वाढदिवसानिमित्त ७५ झाडांचे वृक्षारोपण शुभारंभ…
कोपरगाव प्रतिनिधी
केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आणि उपक्रम यशस्वीतेसाठी व्यापक लोकसहभाग महत्वाचा असून ग्रामस्थांनी मनावर घेतले तर गावाला विकासाच्या उंचीवर नेवू शकतात. असे महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन्मानित सुशांत घोडके यांनी सांगितले
कोपरगांव तालुक्यातील डाऊच बुद्रुक या गावी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्र नेता ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जयंती पर्यंत सेवा पंधरवडा आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २ ऑक्टोबर पर्यंत विविध कार्यक्रम ग्रामपातळीवर हाती घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमृत महोत्सवी जन्मदिवस आणि डाऊच बुद्रुक भूषण ह.भ.प.मनसुख महाराज दहे यांचा ५९ व्या वाढदिवसानिमित्त या अभियानाचा ७५ वृक्षारोपण पर्यावरण संवर्धन संकल्पकरुन शुभारंभ करण्यात आला आहे.

या निमित्ताने विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन्मानित स्वच्छतादूत सुशांत घोडके यांचे सह सरपंच दिनेश गायकवाड, तलाठी भगवान मधे, माजी सरपंच धर्मा दहे ग्रामपंचायत आजी-माजी सदस्य, आदिशक्ती अभियान अध्यक्षा स्वाती ढमाले, ग्रामसेवक विजयसिंह पाटील,मुख्याध्यापिका गवळी यांचे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी स्वच्छतादूत सुशांत घोडके पुढे म्हणाले, सार्वजनिक स्वच्छता, प्लास्टिक निवारण, विविध प्रजातीच्या आयुर्वेदिक वनस्पती, जल साठे,जलशुध्दीकरण तपासणी, गावातील शाळांमध्ये विद्यार्थींची गुणवत्ता तपासणी या सारखे विषय ग्रामस्थांनी नियमित हाताळावे. असे सांगितले.
तलाठी भगवान मधे यांनी सेवा पंधरवडा अंतर्गत गावामधील रस्ते मोकळे करणे, भोगवटादार २ जमीनी एक करणे, सह महसूल अंतर्गत विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
ग्रामसेवक विजयसिंह पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करुन ग्रामसभेचा अजेंडा वाचन केला. तसेच मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाची माहिती दिली.
डाऊच बुद्रुक गावाला आदर्श ग्राम म्हणून या आधी अनेक राज्य पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. या पुढे देश पातळीवर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व्यापक लोकसहभागी होण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला.
