
कोपरगांव प्रतिनिधी:-
आशिया खंडात अग्रगण्य असलेली जिल्हा बँक नेहमीच समाजाभिमुख कामात अग्रेसर असते.सध्या राज्यात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून या विषाणूमुळे जनसामन्यांचे जनजीवन संपुर्णपणे विस्कळीत झाले आहे.बँकेच्या माध्यमातून काम करणारे गट सचिव जिल्हा बँकेशी निगडीत असलेल्या सोसायटी सेवा संस्थांच्या माध्यमातून शेतकरी व सभासद बांधवांच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी तसेच बँक वसुलीच्या कामासाठी त्यांचा थेट संपर्क जनसामान्यांशी येत असतो,परिणामी कोरोनासारख्या महामारीत त्यांच्या आरोग्याचा विचार करुन अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हास्तरीय ५३९ सचीव तर संस्था नियुक्त २१८ अशा एकुण ७५७ गट सचिवांना बँकेमार्फत वैद्कीय विमा सुरक्षा कवच मिळावे अशी मागणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांच्याकडे गेल्या महिन्याभरापुर्वीच केली होती त्याच पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील सर्व गट सचिवांना वैद्यकीय विमा सुरक्षा कवच देण्याचा निर्णय जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने घेतला असल्याची माहीती जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी दिली आहे.
कोल्हे पुढे म्हणाले की,सध्या राज्यात कोरोनाने थैमान घातले असून जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून कर्जवसुलीचे काम शेतकरी व सभासदांपर्यंत प्रत्यक्ष जाऊन गट सचिवांना नेहमी करावे लागते.सध्याची आरोग्यविषयक परिस्थिती विचारात घेता आपला जीव जोखमीत टाकून हे सर्व गट सचिव काम करतात.कर्मचारी हा कुठल्याही संस्थेचा अविभाज्य घटक असतो.संस्थेने कुटुंब प्रमुख या नात्याने त्यांच्या आरोग्याकडे जाणीपुर्वक लक्ष देण्याची आज खरी गरज निर्माण झालेली असल्यामुळेच गटसचिवांना वैद्यकीय विमा सुरक्षा कवच संस्थेमार्फत देणे क्रमप्राप्त होते.
त्याचाच विचार करुन जिल्हा बँकेच्या गट सचिवांना वैद्यकीय विमा सुरक्षा कवच मिळावे या मागणीस जिल्हा बँकेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळाने घेतलेल्या या सकारात्मक निर्णयाबद्दल श्री कोल्हे यांनी सर्वांचे आभार मानले आहे.
