
कोपरगाव प्रतिनिधी:-
“महाराष्ट्र आणि एकूणच भारतभूमी ही संतांची भूमी आहे. या मातीत अनेक संत-महात्मे होऊन गेले, ज्यांनी आपापल्या काळातील अनिष्ट रूढी परंपरा, अंधश्रद्धा तसेच विपरीत जीवन-व्यवहारावर परखड भाष्य करून समाज सुधारणेचा पाया रचला. या संतांचे जीवन आणि काव्य आजही तितकेच प्रासंगिक आहे” असे प्रतिपादन न्यू आर्ट्स महाविद्यालय अहिल्यानगर येथील माजी तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉ. मोहनराव देशमुख यांनी येथे केले. स्थानिक के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या बहि:शाल शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेच्या ‘संतांचे तत्त्वज्ञान आणि आपण’ या विषयावर आयोजित समारोपाच्या व्याख्यानसत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. विजय ठाणगे होते. अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ. विजय ठाणगे म्हणाले की “बहि:शाल शिक्षण हा अत्यंत सुंदर उपक्रम असून त्याच्या माध्यमातून अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अनेक जीवनोपयोगी विषयांवर ही व्याख्याने आहेत. त्यांचा विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा. यातून आपल्याला जीवनविषयक मार्गदर्शन प्राप्त होते.”
9 ते 13 जानेवारी दरम्यान संपन्न झालेल्या या व्याख्यानमालेची पहिली दोन पुष्पे के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय, चासनळी ता. कोपरगाव येथे ‘भारतीय परंपरेतील विज्ञान’ व ‘आधुनिक शेती आणि युवक’ या विषयांवर क्रमशः प्रा. विजय सोनवणे व प्राचार्य डॉ. के. के. देशमुख यांनी गुंफली. या दोन व्याख्यानसत्रांच्या अध्यक्षस्थानी चासनळी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रा. अमोल रणधीर होते.
‘भारतीय परंपरेतील विज्ञान’ या विषयावर मार्गदर्शन करताना प्रा. विजय सोनवणे म्हणाले की “भारतीयांच्या दैनंदिन जीवनातील अनेक बाबी ह्या वरवर पाहता आपणास परंपरा वाटत असल्या तरी सूक्ष्म चिंतन केल्यास असे लक्षात येते की त्यांच्यामध्ये विज्ञान लपलेले आहे. जसे दशावतारांचा क्रम हा मानवी उत्क्रांतीच्या क्रमानुसार दिसून येतो. तसेच वर्षभर साजरे होणारे सर्व सण ऋतुमानानुसार नियोजित आहेत. आपण हे समजून घेतले पाहिजे.”
‘आधुनिक शेती आणि युवक’ या विषयावर मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. के.के. देशमुख म्हणाले की, “मातीचे मूल्य अनन्यसाधारण आहे. एक इंच माती तयार होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. 2014 ते 2024 हे ‘आंतरराष्ट्रीय मृदा दशक’ म्हणून साजरे केले गेले, तर 5 डिसेंबर हा ‘जागतिक मृदा दिन’ म्हणून साजरा केला जातो. आपल्याही देशात ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानाद्वारे मातीचे संकलन व पूजन करून महत्त्व पटवून देण्यात आले.
तिन्ही व्याख्यानसत्रांच्या प्रास्ताविकाद्वारे या व्याख्यानमालेचा उद्देश, भूमिका तसेच अतिथी परिचय सूत्रसंचालन केंद्र कार्यवाह प्रो. डॉ. जिभाऊ मोरे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. एस. बी. पवार यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. सचिन ढेकळे व प्रा. किरण सोळसे यांनी केले. व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी डॉ. अभिजीत नाईकवाडे, रोहित लकारे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
