
कोपरगांव प्रतिनिधी-
गेल्या एक वर्षापासून जगासह संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट आल्यामुळे अनेक नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले तर या आजारामुळे काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. त्यातच कोपरगांव विधानसभा मतदार संघात देखील दिवसेंदिवस कोरोना बाधीत रुग्णांची आकडेवारी वाढत आहे.अनेक नागरिक या कोरोना महामारीच्या भितीपोटी लक्षणे असतांना देखील नागरिक डॉक्टरांचा सल्ला न घेता घरगुती उपचार करत आहे असे न करता नागरिकांनी आपल्या जवळ असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन आपली वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या सचिव ,माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले आहे.
कोपरगांवमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे रुग्णांना उपचार मिळणेसाठी वेळेवर हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही त्यातच ऑक्सिजनचा देखील तुटवडा असल्यामुळे रुग्णांची व नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे.उपाय योजना अभावी अनेक रुग्ण उपचारासाठी जिल्ह्याबाहेर जात आहेत.प्रशासनाने अनेक वेळा कोरोनाच्या प्रादुर्भावासंदर्भात जनजागृती केली तरीही नागरिकांनी गांभीर्य न घेतल्याने हातातली परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भिती निर्माण झालेली आहे ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी नागरिकांनी वेळोवेळी शासनाने दिलेले नियमांचे पालन करणे देखील गरजेचे आहे.
कोरोनाच्या पहिल्या टप्प्यापाठोपाठ दुस-या टप्प्यातही ग्रामपंचायत स्तरावर स्थापन केलेल्या कोरोना समित्यांनी चांगले कामकाज केलेले आहे,मात्र सध्या कोरोनाची लक्षणे मोठ्या प्रमाणात फैलावत असल्यामुळे नागरिक उपचाराअभावी दगावण्याचे प्रमाण वाढत आहे याकरीता कोरोना समित्यांनी गावपातळीवर बारकाईने लक्ष घालून कार्यवाही करण्याची गरज आहे.
आपल्या कुटुंबातील व्यक्तींची काळजी घेऊन काही लक्षणे आढळल्यास त्वरीत प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करुन घ्यावी जेणेकरुन आपल्याला उपचार करणे सोयीचे होईल.काळजी करु नका काळजी घ्या तसेच आपले व कुटुंबाचे आरोग्य अबाधीत ठेवा असे आवाहन सौ.कोल्हे यांनी केले आहे.
