
कोपरगांव प्रतिनिधी:-
सद्या उन्हाची तिव्रता प्रचंड प्रमाणात वाढलेली असल्याने रब्बी हंगामातील पिके पाण्याअभावी सुकून चालली आहेत. दोन – तीन दिवसात गोदावरी कालव्याद्वारे पाणी मिळाले नाही तर सर्वच पिके नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. अशी गंभिर परिस्थिती असताना पाटबंधारे विभाग बिगर मोसमी पावसाची वाट बघत आहे की काय ? असा सवाल जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे
पाटील यांनी केला.
गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने दारणा व गंगापूर धरणात सद्या चांगला पाणी साठा शिल्लक आहे. गोदावरी डाव्या आणि उजव्या कालव्यांना किमान दोन आवर्तने देता येतील अशी परिस्थिती आहे. गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात ऊसाबरोबरच खोडव्याचे पीक प्रचंड प्रमाणात आहे. चारा व भाजीपाला तसेच उन्हाळी रब्बी पिके सद्या शेतात उभी आहेत. विजेच्या सततच्या लपंडावामुळे वीज
मोटारी बंद असल्याने पिकांना पाणी देता येत नाही. काही ठिकाणची पाणी पातळी खालावल्याने विहीरी
व कुपनलिका कोरड्या पडल्या आहेत. शेततळे, के. टी. वेअरमध्ये पाणी शिल्लक नाही. अशा
अवस्थेत पिके जगविणे शेतकऱ्यांना कठीण होऊन बसले आहे. दारणा धरणामध्ये सद्या तेरा टीएमसी इतका पाणी साठा उपलब्ध आहे. मागील वर्षाच्या तुलनेत तो सुमारे साडेतिनशे ते चारशे दशलक्ष घनफुटाने अधिक आहे. मागील वर्षातील पावसामुळे यंदाच्या रब्बी हंगामात सुमारे अडीच ते तीन
टीएमसी पाण्याची बचत झालेली आहे. त्यामुळे धरणातील सद्याच्या पाणी साठ्यातून गोदावरी कालव्याद्वारे दोन आवर्तने सहज देता येतील. पाटबंधारे विभाग आवर्तने जर सोडणारच असेल तर ते
पिके उद्ध्वस्त झाल्यावर सोडणार का ? असा प्रश्न शेतकरी वर्गामधून विचारला जात आहे.
सोमवारपासून नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पातून जलद ( एक्स्प्रेस ) कालव्याद्वारे शेतीसाठी पाणी सोडण्यात येणार असल्याचे समजते. परंतु जलद कालव्याच्या पाण्याचा गोदावरी कालव्यांच्या
लाभक्षेत्रातील शेतीला उपयोग होणार नाही. त्यामुळे जलद कालव्याबरोबरच गोदावरी डाव्या आणि
उजव्या कालव्यांनाही पाण्याची आवर्तने सोडली जावीत. जलद कालव्याच्या लाभक्षेत्राखालील पिकांना पाण्याची आवश्यकता आहे तर मग गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतीला पाण्याची
आवश्यकता नाही का ? की पाटबंधारे विभाग बिगर मोसमी पावसाची वाट बघत आहे ? असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील पिकांना पाण्याची नितांत आवश्कता असून पाटबंधारे विभागाने येत्या दोन – तीन दिवसातच कालव्यांना आवर्तने सोडली नाही तर उभी पिके नष्ट होऊन
कोट्यावधीचे नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागेल. याची सर्वस्वी
जबाबदारी पाटबंधारे खात्याची राहील असा इशाराही श्री परजणे पाटील यांनी दिला.
