
कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):- कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या उपस्थितीवर देखील निर्बंध लावलेले आहेत. यानुसार केवळ ५० लोकांच्या उपस्थितीत सांस्कृतिक सोहळे पार पाडावे लागणार आहेत.
उद्या, रविवार दि. २ जानेवारी रोजी जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांच्या शुभहस्ते व पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणाऱ्या सुविचार गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याची व्याप्ती, भव्यता व लोकप्रियता लक्षात घेता इतक्या कमी संख्येत हा कार्यक्रम करणे शक्य होणार नाही.
तसेच नाशिक शहरात ओमिक्रॉनचा झालेला शिरकाव व कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता नाशिककरांच्या सुरक्षिततेसाठी जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांनी सूचित केल्याप्रमाणे हा कार्यक्रम तात्पुरता स्थगित करण्यात आला असल्याची माहिती सुविचार गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे संयोजक आकाश पगार यांनी दिले आहे.
कोरोना परिस्थिती निवळल्यानंतर ना.जयंत पाटील यांची नव्याने तारीख ठरवून त्यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम लवकरच घेण्यात येईल असे देखील संयोजक आकाश पगार यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
दरम्यान, यंदाच्या वर्षी यामध्ये कला क्षेत्रातील चित्रपट अभिनेत्री पुजा सावंत, अभिनय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल अभिनेते चिन्मय उदगीरकर यांना विशेष पुरस्कार, हेमंत राठी यांना “जीवन गौरव” पुरस्कार, डॉ.अतुल वडगांवकर (वैद्यकीय), निवृत्त प्राचार्य मधुकर कडलग (शैक्षणिक), जेष्ठ साहित्यिक प्रा.शं.क.कापडणीस (साहित्य), नितीन महाजन (प्रशासन), महाराष्ट्र महिला क्रिकेट संघातील खेळाडु ईश्वरी सावकार (क्रीडा), किशोर खैरनार (कृषी) यांना सुविचार गौरव पुरस्कार जाहीर झालेले आहेत.
