

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव बेट भागातील नगरपालिका शाळा नंबर ५ मध्ये नुकताच आजी आजोबा दिवस साजरा करण्यात आला. सप्टेंबर महिन्यातील दुसरा रविवार हा आजी-आजोबा दिवस म्हणून साजरा केला जातो. नातू म्हणजे दुधावरची साय असते. आईबापापेक्षा नातवांवर आजी आजोबा जास्त प्रेम करतात. आजी आजोबा म्हणजे जगातील एक अढळ व अतूट असे नाते आहे. त्यांचे प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबांना शाळेत एकत्र बोलाविण्यात आले होते. त्यांचा शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या नातवाच्या शाळेत झालेला सत्कार पाहून बरेच आजी आजोबा भावुक झाले होते. यावेळी शाळेच्या माजी मुख्याध्यापिका गीते ताई यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधत नसरीन पठाण या राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शिक्षिकेने सर्व विद्यार्थ्यांकरिता रंगपेटी वाटप केले. शाळेचे मुख्याध्यापक विलास माळी व सुनील रहाणे यांनी आजी आजोबांचे एकत्र कुटुंब पद्धतीत महत्त्व विशद केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा पूनम गगे,भास्कर गोधडे, नामदेव माळी, शांता माळी, साहेबराव शितोळे, इंदुबाई सुपेकर, मंदाबाई शितोळे, केशरशिंग परदेशी, दिपीका परदेशी, गोविंद गोधडे, विठ्ठल लकारे, अनुसयाबाई रक्ताटे, संगीता जोशी, रत्नाकर जोशी, बेबी पठाण, मोहन गगे, शोभा ढाकणे, सुभाष ढाकणे, राजेंद्र बर्डे, मंगल कर्डीले,मंगल मोरे, माणिक कर्डीले, विठ्ठल मतकर, सत्यभामा गगे हे आजी आजोबा उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नसरीन पठाण यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विलास माळी, सुनील रहाणे, नसरीन पठाण, अमोल कडू व रजनी काळे यांनी परिश्रम घेतले. मुख्याध्यापक विलास माळी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
