
कोपरगाव प्रतिनिधी:-
4 वर्षात सर्वच प्रभागात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली,होत आहेत,अजून काही होणार आहेत.आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी बहुमताचा गैरवापर करून शहर विकासाची कामे नामंजूर करणारा कोल्हे गट राजकिय द्वेषाने पिसाळलेला आहे.शहरातील मोक्याचे रस्ते झाले तर नगराध्यक्ष विजय वहाडणे व आ.आशुतोष काळे यांना श्रेय मिळेल म्हणून विरोध करण्याच्या नादात कोल्हे गटाने स्वतःच्याच प्रभागातील 25 कामेसुद्धा नामंजूर करून अक्षरशः मूर्खपणा केलेला आहे.खडीकरण,डांबरीकरण, काँक्रीटीकरण,पेव्हर ब्लॉक,गटार इ.अनेक कामे नगरसेवकांच्या व नागरिकांच्या मागणीवरूनच करायचे सर्वानुमते ठराव करून करण्याचे ठरले होते.पण नेत्यांच्या आदेशावरून सदरची कामे नामंजूर करण्यात आली.नगरपरिषदेच्या निवडणुकीआधी कामे होऊच नयेत यासाठी कुटिल डावपेच सुरू आहेत.
ई.निविदा न काढता छोटी छोटी कामे केली,पेव्हर ब्लॉकची जास्त कामे केली अशा तक्रारी करणारेच मला व मुख्याधिकाऱ्याना भेटून सतत अशा कामांसाठी तगादा करत असतात.माझ्याशी खाजगीत गोड बोलणारे आदेश आल्यावर मात्र आरडाओरड करतात.आजही माझ्याकडे येऊन फाईल बघा.एका नगरसेवकाने ठेकेदाराकडे वर्कऑर्डर असूनही खडीकरण करण्याचे काम मात्र स्वतःच केले असे निदर्शनास आलेले आहे.संबंधित नगरसेवकाचे नांव जाहिर करावे असे वाटत असल्यास तसे सांगावे.आमच्या प्रभागात काम करण्यासाठी शिफारस द्या असे कोल्हे गटाच्या नगरसेवकाचे “पत्र” कुणीही माझ्याकडे आले तरी ते पत्र बघायला मिळेल.कामाचे बिल मिळावे म्हणून बेशरमपणे चकरा मारणारेच शहाजोगपणे पत्रकार परिषदेत बोलत असतात.अशांना पोसणारे नेतेच शहर विकासाला घातक आहेत. मोक्याचे रस्ते नामंजूर केलेच,पण स्वतःच्याच प्रभागातील कामेही नामंजूर करून कोल्हे गटाच्या काही नगरसेवकांनी अकलेचे दिवाळे काढलेले सिद्धच झालेले आहे.एस्टीमेट जास्त आहे म्हणून कामे नामंजूर करणाऱ्यानी 5 ते 7 लाखांची कामेही का नामंजूर केली? कारण फक्त एकच “नेत्यांचा आदेश”
–विजय वहाडणे
